*समर्थांचे साहित्यविश्व*16-10-2020

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विवेक हा भला भला..|*
*उदंड राम देखिला..|*
*पदी अनन्य मीळणी..|*
*उरी नसे दुजेपणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

सद्विवेकबुद्धीने भारलेल विचारीपण म्हणजे विवेक.समसमा बुद्धि.आणि हा प्राप्त होतो रामकृपेमुळी. मनात कृतिशील परमार्थ उभा राहतो तोच खरा विवेक..!

समर्थ रामदास म्हणतात...

अशा विवेकबुद्धीने रामाच्या चरित्रामधील अनेक छटा अनुभवता येतात.राम जो  सर्वस्पर्शी आहे,सर्वसाक्षी आहे..!असा राम पहाण, त्याच संकीर्तन करणं,त्याची उपासना करणं.किती आल्हाददायक आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा राम आपल्याला त्याच्यात सामावून घेतो.आपण त्यात इतके समरस होतो की तो आत्माराम आपल्याला  मनापासून तनापर्यंत आपल्यात दिसू लागतो.

समर्थ रामदास म्हणतात..

अशी राममय वृत्ती झाली की तो राम आणि आपण  रामदास यांच्यात वेगळेपण रहातच नाही.पिंडी ते ब्रम्हांडी अशी अवस्था होऊन जाते.आणि पूर्ण  आयुष्याचा रघुराज होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी.सातारा
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व*17 -10-2020

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विचार सार सारसा..|*
*करील कोण फारसा..|*
*बळे बळेचि नीवळे..|*
*कळे कळेचि आकळे..|*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

इतका सरळ भक्तिमय असा पंथ आहे या परमार्थाचा.रघुरायाला प्रसन्न करण्याचा.या पंथाला जायचा नुसता विचार ही सरळ सरळ मुक्तीची वाट दाखवून जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

पण प्रापंचिक लोकांना तेच थोडं अवघड जात.ते भक्तीचा विचार करायचा सोडून आसक्तीचा मोह मागे लावून घेतात.तो सोडून ही मुक्तीची वाट चोखाळणारे भाग्यवंत तसे कमीच..!

समर्थ रामदास म्हणतात..

अगदीच एखाद्या प्रापंचिकाने ह्या भक्तिमार्गाची निवड केली तर तो सर्व प्रथम बिचकतच या मार्गात येतो.आणि मग ही भक्तीसुद्धा काहीशा नाखुशीने स्वीकारतो.पण हळू हळू त्याचे फळ त्याला मिळू लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

एकदा का ही गोडी लागली की सगळं आयुष्य रामरायांच्या कृपेने सुगम होऊ लागते.अनेक प्रश्न सुटू लागतात.विषयविवंचना निरसून जाऊ लागते.आयुष्य मंगल होऊन जाते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी,सातारा
९८२२६३५९०२

*जगदंबेचा शब्दजागर-१*

*जगदंबेचा शब्दजागर-१*

शैलपुत्री..!
जगदंबेच एक कोमल रूप..!
दक्षाच्या यज्ञसमयी पतीचा (शंकराचा) अपमान सहन न झालेल्या सतीने योगसामर्थ्याने स्वतःचा दाह करून घेतलेल्या या स्त्रीशक्तीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला..!

तीच ही शैलपुत्री..!

राखेतून स्वतःच प्रेम जाज्वल्य तेवत ठेवणारा मंदशाक्त हुंकार म्हणजे ही शैलपुत्री..!

हे रूप शब्दात वर्णन करायचं तर..
अभिमान रुपी मदांध वृत्तीरुपी वृषभावर स्वार होऊन त्याला आपल्या नियंत्रणात आणणारी ही स्त्रीवृत्ती म्हणजे ही शैलपुत्री..!

त्रिशूलाच्या तीन अग्रावर पतिरुपाने तापत्रयींच्या विकारी नजरा रोखणारी ही शैलपुत्री..!

पीतवस्त्रा मृगनयना एक सुदृढ अवतारीका म्हणजे ही शैलपुत्री..!

कमळाच्या कोशल अस्तित्वावर सुखाच दव पांघरणारी मातृशक्ती म्हणजे ही शैलपुत्री..!

हे स्वरूप स्नेहल मातृत्वाची एक ओळख...स्वतःला संपवून स्वतःच्या मनातलं पतिप्रेम आणि अभिमान जागवत ठेवणारी ही अनुरक्ता..!

सृष्टीउदयाच्या सुरुवातीला स्वतःच्या उदरात पूर्वीच्या  अवतारातील जन्माच झालेलं भस्म लपवून सृजनाचा कमलोदय देणारी ही भगवती म्हणजे शैलपुत्री..!

आई हा जागर तुझ्या चरणी अर्पण..!🙏
उदयोस्तु..!उदयोस्तु..!उदयोस्तु.!!

©प्रवीण कुलकर्णी, सातारा
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तदूपरी विवंचना..|*
*विचार आणिता मना..|*
*मनास ठाव नाडळे..|*
*विशेष हेतही गळे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

या सगळ्या आयुष्यात भक्ती करत असलो तरी अनेक विवंचना प्रपंचामुळे पाठी लागतातच.यांना कोणताही धरबंध रहात नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

परमार्थाचा विचार मनात जेंव्हा जेंव्हा येतात तेंव्हा तेंव्हा हे विचाररूपी विकल्प ,विवंचना मनात हटकून येतात आणि सारे धूसर होऊ लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

हे झालं की मन एका जागी स्थिर रहात नाही.त्याला अनेक प्रकारची व्यवधाने सुरू होतात आणि मी अतिशय उपासनेपासून दूर होऊ लागतो.

समर्थ रामदास म्हणतात..

आणि मग मी केलेला संकल्प तडीस जायच्या सगळ्या शक्यता मावळू लागतात.सगळा परमार्थ अशक्य वाटू लागतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी,सातारा
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*समस्त ही पदेपदे..|*
*प्रभूपदेचि वीशदे..|*
*विचार सार जोडला.|*
*सदृश्यभास मोडला..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या आयुष्याच्या प्रवासाची ही पाऊलयात्रा केवळ रघुनाथाच्या गुणपदाची सांगाती आहे.त्याचे गुणगायन हे माझ्या पावलांच्या गतीचे,वृत्तीचे कारण आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे संकीर्तन मी करायला लागलो तेंव्हा मला आयुष्यातील घटनांनाचा निरक्षीर विवेक कळायला लागला.आयुष्य पूर्ण करणाऱ्या परमर्थाला आपलंसं करायची बुद्धि मला या रामरायांनीच वीशद करून दिली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळे चिंतन करून मी जेव्हा त्याचे यथोचित सार शोधू लागलो,त्या सगळ्या कृपेची मीमांसा करू लागलो तेंव्हा तिथे मला अनुभूती येऊ लागली.

समर्थ रामदास म्हणतात..

ही अनुभूती म्हणजे माझ्या आयुष्यातील ऐहिक वस्तूच्या,तापत्रयी निर्माण करणाऱ्या घटनांची अनावश्यकता,फोलपणा मला सहजतेने समजू लागला आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी,सातारा
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*प्रपंच संचिता हरी.|*
*विसंचिता बरोबरी.|*
*दयाळ तो परोपरी.|*
*विशाळ सेवका करी.|*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

साठलेली प्रपंचातील तापत्रयी,उद्वेग,दुश्चित्तपणा हे सगळं हा रामराया त्याची उपासना करू लागलो की आपल्याकडून त्याग करून घेतो.हे सगळं आपल्यापासून दूर घेऊन जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या सगळ्या प्रापंचिक,शारीरिक उपाध्या दूर झाल्या की तो रामराया आणि आपण यात अंतर काहीच रहात नाही.तो आणि आपण त्याच्या उपासनेच्या साह्याने एकरूप होउ लागतो.बरोबरीचे होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

तू रघुराज इतका दयाद्र होतो.क्षणाक्षणाला कृपा करतो की प्रत्येक वेळी आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे त्याच प्रेमाच देणं होऊन जातं.

समर्थ रामदास म्हणतात..

ही कृपा करता करता रघुराज इतक देतो त्याची उपासना करणारा भक्त हा दिवसेंदिवस उदात्त,अपरिमित,अमूल्य होत जातो.तो एक भक्तीपूर्ण  विश्व होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*श्रीराम भक्तमूळ रे|*
*प्रसन्न  सानुकूळ रे |*
*समर्थ तो तयागुणे |*
*समस्त होय ठेंगणे |*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

प्रत्येक भक्ताचे मूळ त्याची सुरुवात,त्या भक्तांचा उगम हा राम आहे आणि या भक्तांच मुख्य उद्दिष्ट,कायमचा अंतिम ध्यास हा रामच आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामराया अतिशय सुमुख असा आहे.तो दर्शनाने आनंददाता,त्याच अनुकरण हे आनंदमार्ग,त्याची प्राप्ती ही कायममुक्ती आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायांची अनुकूलता,त्याच प्रत्येक प्रसंगी आपल्याबरोबर असणं..प्रत्येक अवस्थेत राम बघणं या मुळे भक्त हा स्वतः ऐहिक तापत्रयीतून मुक्त होऊन स्वतः समर्थ होतो.त्या अर्थाने कृतार्थ होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायांची भक्ती करून हा सामान्य भक्त अशा उंचीवर पोहचतो की जेथे सर्व सुखे अतिशय खुजी वाटतात.रामाचा संग, रामरंग हा त्याला सर्वोच्च सुख प्रदान करतो.आणि तो अच्युत,अढळ अशा मुक्तीपर्यंत पोहचतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*नवस हरिकथेचे राम भक्ती करावे..|*
*कठिण विषम काळी मम जीवी धरावे..|*
*विविध सकळ काही दोष नासुन जाती..|*
*रघुविरभजने हो कामना पूर्ण होती..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामभक्तीने भारून गेलेल्या आयुष्यात कामना,इच्छा फक्त हरिकथेची, रामसंकीर्तनाची करावी..!त्यासाठीचे नवस हे भक्ती सुदृढ होण्यासाठी  रामरायांच्या चरणी सदोदित करावे.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या आयुष्यातील अनेक विषम काळ,दुःखाने हरवून गेलेले काही प्रसंग,काही विरुद्ध असे घटनाक्रम अशा काळी रामराया तू मला तुझ्या हृदयापाशी धरून ठेव.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या हातून होत असलेल्या या तुझ्या संकीर्तनाने माझ्या मनात साठलेले सारे दोष,किल्मिष निरसन होऊन मन अगदी शुद्ध होऊन जाईल.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा भक्तीपंथात,परमार्थात एकच इच्छा राहते ती म्हणजे रघुवीर दर्शनाची,मुक्तीची ती ही या संकीर्तनाच्या आवडीने, व्रताने पूर्ण होऊन आयुष्य कृतार्थ होते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विषम गति मनाची ते मला आवरेना..|*
*शरीर विकळ कामे ते कदा सावरेना..|*
*सुख दुःख मज माझे वाढिले तेची जेऊ..|*
*रघुपती.!तुजला रे कासया बोल ठेऊ..?||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

मनाने खर म्हणजे जन्म मरणाच्या मुक्ततेते कडे जावे.आपले स्वहित करावे.मनुष्यजन्माचे सार्थक साधून देवचरणी कायमचे गढून जावे.

समर्थ रामदास म्हणतात..

शरीर ऐहिक भावनांच्या अतिरेकाने,त्याच्या विचाराने अतिशय गलितगात्र झालं आहे की जे सावरायचा प्रयत्न केला तरी सावरता येत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या कर्म गतीने मला सुखदुःखाने युक्त असे आयुष्य दिले आहे.ते जगणे,ते व्यतीत करणे हे माझे कर्तव्य आहे.त्याचे फलित आनंद असो किंव्हा विषाद असो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया,हे सगळं माझं संचित आहे.माझी कर्मरेखा आहे.माझ्या पूर्वजन्मीचा आणि आजच्या चालू जन्माच्या कर्मानुसार भोग मी स्वतः ओढून घेतले आहेत.त्याबद्दल तुला मी कधीच दोष देत नाहीये..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*शमशम विषयांची काही केल्या शमेना..|*
*अचपळ मन माझे साजणी हे दमेना..|*
*अनुदिन मज पोटी दुःख तेही वमेना..|*
*तुजविण जगदीशा वेळ तोही गमेना..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

विषयांची प्रदीर्घ वखवख ही आयुष्याला पुरून उरत चालली आहे.त्या विषयांचा  अंत हा दृष्टिला कुठेही दिसत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या विषयांच्या कर्दमात मन अडकून राहू लागल आहे.आणि ते इतक्या वेळा गुंतून ही त्यातून अलग होत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्याची परिणीती मन अतिशय मनात वैषम्याची स्थिती निर्माण होत असली तरी त्याचे निरसन मी करू शकत नाहीये.ते दुःख त्याग करू शकत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळं आहे पण तुझ्या अस्तित्वाशिवाय मला कोठेही मन रमवता येत नाहीये.त्यामुळे परम सुखाची परमार्थाची प्राप्ती ही होत नाहीये.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*हरि हरि दुरिते तो स्वामी वैकुंठराजा..|*
*सुरवर नर पाळी शोभती चारी भुजा..|*
*झळफळीत किळा हे हेमरत्नांबराचा..|*
*परम कुशळ शोभे नाथ लोकत्रयाचा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

तो हरि नाव धारण करणारा,दुरितांचे दूरत्व हरण करणारा हा वैकुंठाच्या सिंहासनावर आरूढ झालेला महाविष्णू केवळ अगाध स्वरूपी आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

इंद्रादी देवतांनाही जो पूज्य असा तो चतुर्भुजधारी  महाविष्णू अतिशय मनोहर असा दर्शन देणारा देवाधिदेव आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या महाविष्णूच्या वास्तव्याच ठिकाण हे सोन्याच्या महिरपी,रत्नांची जडवणूक आणि रजताच्या आकाशाचा आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा अतिशय प्रेमळ आणि सकलकल्याणकारी असा देव तिन्ही लोकांचा त्राता होऊन इथे आधिष्ठीत होऊन राहिला आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विगळीत मन माझे तू करी देवराया..|*
*हरिभजन कराया पाहिजे दृढ काया..|*
*निरूपण विवराया तर्कपंथेचि जाया..|*
*रघुपतिगुणछाया चित्त माझे निवाया..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया, तू माझे मन इतके निरिच्छ कर की ते त्रिगुणविरहित,वासनाहीन होऊन कल्पनाऔदासिन्याने भरून जाऊ दे.ते एक निश्चल असे बेट होऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

हरिसंकीर्तन करायचे असेल तर मन आधी देवाचे झाले पाहिजे.त्यासाठी दृढतेने फक्त भक्तीची कास आणि आस अतिशय आग्रहाने माझ्या शरीराने,मनाने आपलीशी केली पाहिजे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवलीला असलेल्या आगम-निगम कथा समजून घ्यायच्या तर निरुपणाचा वाचिक आणि श्रवणीक ध्यास हा असला पाहिजे.आणि त्याची तर्कसंगत मांडणी आणि विवेचन मनातल्या मनात करता आलं पाहिजे.आणि समाजामध्ये प्रभावी पद्धतीने मांडता आल पाहिजे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळे झाले की रामरायाच्या अनेक लिलायुक्त कहाण्या आणि त्यातून प्रतीत होणारे त्याचे गुणवैभव पाहून,ऐकून माझं मन एक शांत असा नदीचा प्रवाह होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विषयविष वमावे कल्पनेला दमावे..|*
*निजपद निजभावें दृढ चित्तीं धरावे..|*
*भवभय निरसावे साधुसंगी वसावे..|*
*सगुणभजन द्यावे स्वामी देवाधिदेवें..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

परमार्थाच्या दृष्टीने,सकल कल्याणाच्या दृष्टीने बाधक असा जो विषयसुख नावाचा एक हलहलाचा घोट आहे जो माझ्याकडुन घेतला जातो त्याचा माझ्याकडून शारीरिक,मानसिक त्याग होऊ दे..!अशा क्षणिक सुखांची कल्पना,वासना याचे चिंतन करण्याचा वीट मला येऊ दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

एक असे अढळ निश्चिन्त जन्ममरणाच्या फेऱ्याला चुकवणारे मानसिक स्थान मिळवण्याचा कायमचा ध्यास या रामकृपेने मला मिळेल अशी कायम श्रद्धा मनात ठेवून तेच ध्येय असू द्यावे.

समर्थ रामदास म्हणतात..

भवभय नावाचे जे दुःख  उत्पन्न करणारे मनाचे खेळ आहेत ते सज्जनसंगत,साधूसंगत, गुरुसंगत या उपायांनी कायमचे आयुष्याच्या पल्याड सोडून केवळ रामभक्ती, संकीर्तन यासाठी या महानुभावांच्या संगतीत काळ व्यतीत करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सर्व साधण्यासाठी हे रामराया मला सगुणभजन,संकीर्तन आणि भक्ती करण्याचा वसा मला आशिर्वाद रूपाने मला दे कारण तूच माझा कर्ता,पालनकर्ता असा स्वामी आहेस.कारण तू आम्हा सकलांचा देवाधिदेव आहेस.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२