समर्थांची करुणाष्टके (६) कडवे तिसरे...

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात...

बळे लाविता चित्त कोठे जडेना..
समाधान ते काही केल्या घडेना..
नव्हे धीर नैनी सदा नीर लोटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..माझं मन मी तुझ्या भक्तीत गुंतवायचा  प्रयत्न करतोय.कदाचित त्याच्या स्थायीभावानुसार त्याच्यावर एकप्रकारची जबरदस्ती करतोय.त्याचे अंश इतर ठिकाणी भौतिकतेत अडकलेले असल्यामुळे ते एका ठिकाणी एकाग्र होत नाहीये.

रामराया..हे सगळं असताना सुख मिळत पण त्यापासून निर्माण होणारे आणि अपेक्षित असणारे समाधान हे काही प्राप्त होत नाहीये.कारण मला माहित आहे सुखाच्या अपेक्षेला  अंत नाही आणि समाधानाला मात्र पूर्णत्व आहे...

रामराया..आता मात्र माझा धीर सुटत चाललाय.मला तुझी आस अशा टोकाला घेऊन चाललीये जिथे तुझी ही भक्ती व्याकुळते मध्ये मिसळत चाललीये आणि ती माझ्या डोळ्यातून अश्रूद्वारे व्यक्त होऊ लागली आहे..

रामराया..या सगळ्या मंथनातून तू मला तुझ्या कुशीत ओढून घे कारण तुझ्याशिवायचा हा काळ उदासीनते मध्ये असल्या मुळे मला तो सफल जगता येत नाहीये रे..!!

आपण ही आपली भक्ती ही शब्दाकडून व्यक्ततेकडे आणि व्यक्ततेतून प्रापंचिक उदासीनतेकडे न्हेली तर हे आयुष्य केवळ सुखकारक नाही तर समाधानाचे होईल..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment