समर्थांची करुणाष्टके (३), कडवे चौथे..

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे चौथे..

समर्थ म्हणतात...

किती भार घालू रघुनायकाला...
मज कारणे सीण होईल त्याला...
दीनानाथ हा संकटी धाव घाली...
तयाचेनि हे सर्व काया निवाली...!

रामराया...मला नेहमी अस वाटत की माझं सुख,माझी सुबत्ता,माझं वैभव हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे..तुझ्यावर भार आहे..!तूच त्यासाठी काळजी घेतोस..आणि तूच मला हे सारं पुरवतोस..! तुझ्यावर भार घालायच्या माझ्या प्रवृत्तीची माझी मलाच लाज वाटू लागली आहे..!

रामराया..मला माहिती आहे  कायम माझ्या सभोवती,माझ क्षेमकुशल,मंगल घडवण्यासाठी तू अपरंपार कष्ट घेतो आहेस..!मला खजील व्हायला होत की तू देवाधीदेव असून माझ्यासाठी इतका दमून जातोस...!!

रामराया,एवढंच नाही तर माझ्या सुखाच्या काळात ते देण्यासाठी तू माझ्याबरोबर असतोसच पण माझ्या दुःखाच्या,परीक्षेच्या काळात तू माझ्यासाठी धावून येतोस..!ते दुःख निवारण करून सुखाची बेगमी करतोस..!

रामराया..अस सगळं तुझं अस्तित्व सर्वकाळी माझ्याभोवती,माझ्या क्षुब्ध मनात एक शीतल छाया निर्माण करून जात..!आणि त्या तुझ्या कृपेच्या सावलीखाली माझं तनमन शांत निवांत होत जात...!!


समर्थ आपल्या भोवती रामराया ने ठेवलेल्या सुखप्राप्तीच्या मार्गाची जाणीव ठेवतात.तसच ते सुख निर्माण करण्यासाठी तो रामराया सदा सन्निध राहून एकप्रकारे कष्ट घेतोय अशी कबुली ही देतात..!

आपण ही आपल्या सुखाच्या वाटेवर घेऊन जाताना रामरायच त्या पायवाटेवर अनुभवतो ना?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे तिसरे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात..

रघुनायका दिन हाती धरावे...
अहंभाव छेदूनिया उद्धरावे..
अगुणी तयालागी गुणी करावे..
समर्थे भवसागरी उतरावे..!

रामराया..तुझ्यासारख्या सुखदाता,आनंददाता,कृपावंत,विर्यवान अशा दैवताने माझ्यासारख्या मुढ साधकाला हाती घेतल तर मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यातसाठी ची वाट सुकर होऊन जाईल..!

रामराया...माझ्यातले अहंकाराचे बीज,देहभावाची ओढ,सुखाच व्यसन हे सगळे अवगुण मुळापासून छेदून टाकलेस तर मी तुझा भक्त होण्यासाठी थोडा लायक होईन..!

रामराया...माझ्यातले गुण जे तुझ्या भक्तीसाठी आवश्यक आहेत ते माझ्या अहंकार,देहबुद्धी आणि स्वार्थ याने विस्मृतीत गेले आहेत,त्यावर या सगळ्या अवगुणांचं मळभ दाटल आहे..ते बाजूला करून माझे गुण तू दाखवून देशील..जेणेकरून मी तुझ्या भक्तीत परिपूर्ण होऊ शकेन !

रामराया.. हे सगळं झालं तर मग मी या जगाच्या रोजच्या कार्यात,संसारात,प्रपंचात असून सुद्धा तुझ्या भक्तीपासून वंचित न होता सुखनैव आयुष्य कारणी लावू शकेन..!


समर्थ स्वतःच्या देह आणि मन यावर वेगवेगळे यथोचित संस्कार करून  ईश्वरभक्तीच्या मार्गावर मला घेऊन जा अशी रामाजवळ विनवणी करतायत..!
आपण ही अशी विनंती करायला हवी होय ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२