समर्थांचे साहित्यविश्व (अभंग २)(भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग २*

*भाग १*

*का हो रामराये दुरी धरियेलें..|*
*कठीण कैसे झाले चित्त तुझे.?||१||*

*देऊन आलिंगन प्रीति पडीभरे..|*
*मुख पीतांबरे पुसशील..||२||*

समर्थ म्हणतात..

रामराया..सांग ना? मी तुझ्यासन्मुख उभा राहून तुझी उपासना,आराधना करतोय.तुझी मानसपूजा करतोय.नामपूजा करतोय.पण तु मला अजूनही दूरच ठेवलं आहेस.अस का बरं करतो आहेस.?

समर्थ म्हणतात..

रामराया..तू तर दयार्द्र चित्ताचा म्हणून प्रसिद्ध आहेस.तू भक्तांच्या मनातलं ओळखून प्रसन्न होतोस.मग आता तुझं हृदय इतकं कठीण का झालय.?का तू मला तुझ्या चरणाशी जागा देत नाहीयेस.?

समर्थ म्हणतात..

रामराया..तू मला जवळ घेऊन प्रेमभराने उराउरी भेटशील.मला आलिंगन देऊन कृतार्थ  करशील..!पण हे केंव्हा करशील रे..?

समर्थ म्हणतात..

रामराया..माता जशी बालकाला जवळ घेऊन पदराने त्याच कपाळ,मुख मायेने पुसते. तस तू ही तुझ्या रेशमी पितांबराने माझ्या कपाळावर उमटलेले धर्मबिंदू टिपून घेशील ना?

समर्थ रघुराजाला आईच्या रुपात बघून त्याने वात्सल्यपूर्ण प्रेम,काळजी आपली करावी असा बाल्यसुलभ हट्ट त्याच्याकडे करतायत.लिन भक्तीच आणखी एक रूप.समर्थ जगतायत आणि आपल्याला ही ते रूप दाखवत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

आम्ही काय कुणाचे खातो..

*आम्ही काय कुणाचे खातो रे..?तो राम आम्हाला देतो रे....!!!*

समर्थांची ही रचना समर्थांच्या मुखातून ऐकली असती तर किती भाग्यवान झालो असतो आपण..?

सहा,साडेसहा फुटी बलदंड देह,उजव्या हातातील कुबडीचा त्या अंतहीन आकाशाकडे रोख...अंगावरच्या भगव्या वस्त्राची ज्योतिसारखी फडफड..गळ्यातली त्वेषात हलत असलेली रुद्राक्षमाळ..आणि चेहऱ्यावर वर असीम रामभक्तीच तेज,डोळ्यात कैवल्यपूर्ण विश्वास..!
असे समर्थ जेंव्हा प्रत्येक संकटाला,प्रत्येक हतबलतेला असा प्रश्न विचारताना कसे असतील..?

मलंग अवस्थेतील हा महात्मा या पूर्ण जगात फक्त राम आणि रामभक्तीवर अवलंबून होता.देहाची फिकीर नाही..मानवी ऐहिकतेची पर्वा नाही..!
फक्त राम..!घेणारा,देणारा,अनुभवणारा,सावरणारा राम...!
इतका पराकोटीचा  पारमार्थिक त्वेष हा त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवर ओढलेला आसूड होता.

परकीय आक्रमणामुळे पराधीनता शिगेला पोहचली होती.जो तो दबकून आयुष्य जगत होता.अशा परिस्थितीला नजरेला नजर देऊन हा प्रश्न विचारणारा सैराट असा हा मनजेता..!

तटावर फुटलेल्या वटवृक्षासारखा आशेचे किरण फोडणारा हा संत.केवळ पाषाण असलेल्या उभ्या चिरेबंदीत जीवन शोधणारा हा आशावादी संत..!
तो राम तिथे जगवतो,ती रामवृत्ती आयुष्याच्या रूपाने तिथे जन्म घेते..!हे सिद्ध करून त्याचा उद्घोष करणारा हा नरसिंह..!

सजीवांची उत्पत्ती,निर्जीवांची व्युत्पत्ती हे सारं राम निर्माण करतो.तो रामच आम्हाला देतो.

कोणी कुणाचं दास नाही,कोणी कुणाचा त्राता नाही.सार काही फक्त राम आहे.

कष्टाच्या रूपाने राम शिणतो.मोलाच्या रुपात राम मिळतो.

इतकी काहींची बेछूट आरोळी देणारा हा समर्थ रामदास नावाचा अवलिया..!

हे समर्थ रामरायांच्या रुपात आपल्या मागे उभे असतील तर आपण ही तितक्याच मलंग,अलख अवस्थेत म्हणू शकतो...

*आम्ही काय कुणाचे खातो रे.. तो राम आम्हाला देतो रे..!🙏*

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग १) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग १*

*भाग २*

*म्हणोनी आमुचे कुळी कुलदैवत |*
*राम हनुमंत आत्मरूपी ||३||*

*आत्मरूपी झाला रामी रामदास.|*
*केला उपदेश दिनोद्धार..||४||*

समर्थ म्हणतात...

आमुच्या कुळात कुलदैवत म्हणून रामराय अवतरले.आणि त्याबरोबर  हनुमंतराय ही.पण हे दोघेही केवळ सगुण रूपातच पूजन करण्यासाठी आमचे कुळी राहिले नाहीत तर आम्हा  प्रत्येकाच्या मनात निर्गुण स्वरूपात आत्मरूप होऊन राहिले आहेत.संपूर्ण कुळच राम झालं आहे.

समर्थ म्हणतात..

या साऱ्या रामकृपेचा परमोच्च बिंदू म्हणजे माझ्यासारख्या या दासाचा रामरायांनी रामदास करून घेतला आहे.रामरायांनी त्यांच्या आत्मस्वरूपाची ज्योत माझ्या हृदयी चेतवली आहे.आणि या आत्मतत्वाने असा काही आमूलाग्र बदल घडवला आहे की या दिनाचा रामदास होऊन गेला आहे.

समर्थ रामकृपेची परिणीती किती उद्बोधक होते याच वर्णन स्वतःच्या राममय अवस्थेवरून सांगतायत.या अभंगात रामाची कृपा असेल तर दिनाचा रामदास कसा होऊ शकतो याच वर्णन समर्थांनी केलं आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग १)(भाग१)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग १*

*भाग १*

*उपदेश देवुन दीधला मारुती |*
*स्वये रघुपती निरविता..||१||*
*निरविता तेणें झालो रामदास |*
*संसारी उदास म्हणऊनी..||२||*

समर्थ म्हणतात...

उपदेशाच्या दातृत्वातून येणारी विरक्ती अजूनच विलोभनीय असते.रामरायांनी तसाच मारुतीरायांना उपदेश केला.भक्तश्रेष्ठ अशी ख्याती असलेल्या  मारुतीरायांना रामरायांनी प्रेमापोटी उपदेश केला तो विरक्तभक्तीचा..!

समर्थ म्हणतात..

भक्तीची अंतिम अवस्था विरक्तभक्ती. जिथं प्रेम,निष्ठा सगळं निर्गुण होत.आणि अभेदभक्ती,विरक्तभक्ती निर्माण होते.

समर्थ म्हणतात..

रामरायांच्या पदकमलापाशी मी जेव्हा सगुणत्वाचा हट्ट धरून बसलो तेंव्हा त्यांनी मला समजावलं.मला शिकवलं हेच विरक्तभक्तीच श्रेष्ठत्व.

समर्थ म्हणतात..

त्यामुळे  आम्ही रामदास झालो.आणि या  विरक्तभक्ती मुळे रामदर्शनाशिवाय प्रत्येक सांसारिक,प्रापंचिक गोष्टीत सम्यक उदासीनता निर्माण झाली आहे.आणि प्रापंचिक गोष्टींची जागा रामभक्तीने घेतली आहे.

प्रत्यक्ष रामाचे अनुग्रहित समर्थ.समर्थांचा प्रत्येक विचार,आचार हा रामाच्या अस्तित्वाने व्यापलेला.असे समर्थ रामाच्या उपदेशाविषयी या अभंगात सांगत आहेत 

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (भूपाळी) (भाग ४)

*समर्थांचे साहित्यविश्व..*
*भुपाळी*

*भाग ४*

*राम योगीयांचे मंडन..*
*राम भक्तांचे भूषण..*
*राम आनंदाचा धन..*
*करी रक्षण दासांचे..!*

समर्थ म्हणतात..

हा रघुराज आहे ना?तो तापसांचे तप,योगीयांचा योग,संन्याशाचे संन्यसत्व आहे.तो रघुराज त्यांचं सकल साध्य आहे.आणि साधन ही.

समर्थ म्हणतात..

हा रघुराज भक्तांसाठी आनंदाच कारण आहे.आरतीतल वर्णन,अभिषेकातल सुक्त आहे.हा राम भक्तांसाठी एक विश्रामयुक्त धाम आहे.

समर्थ म्हणतात..

रघुराज एक आनंदाच अस्तित्व आहे.थिजलेल्या पण तृषार्त अशा भक्तांच्या मनासाठी, समूहासाठी राम हा सअमृत असा नभ आहे जो भक्तांमध्ये चैतन्य निर्माण करतो.

समर्थ म्हणतात..

रघुराज हा भक्तपालक ही आहे.जो संसारात भक्तांच तापत्रयी पासून आणि परमार्थात षड्रिपुपासून  रक्षण करतो.असा रघुराज हा कोणाच आराध्य नसेल बरे..?सगळ्यांच्या ठायी आणि सर्वांच्या भोवती तोच आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (भूपाळी) (भाग ३)

*समर्थांचे साहित्यविश्व..*
*भूपाळी*

*भाग ३*

*राम भावे ठायी पडे..*
*राम भक्तीशी आतुडे..*
*राम ऐक्यरूपी जोडे..*
*मौन पडे श्रुतीसी..!*

समर्थ म्हणतात..

रघुराज हा भावाचा भुकेला आहे.कोणताही अन्न,वस्त्रदीक अर्पणापेक्षा तो भावार्पण जिथे आहे तिथे लवकर प्रसन्न होतो असा अनुभव आहे.

ह्या रघुराजाला बोलावण्याचा,त्याच्याशी अनुसंधान बांधायचा,आपल्या भोवती सदा कृपामयी ठेवायचा एकच मार्ग आहे..तो म्हणजे अपरिमित भक्ती,अतुल्य भक्ती.

समर्थ म्हणतात..

हा रघुराज एकसंध,समूहाचा स्फुरणदाता आहे.जिथे भक्तीयुक्त ऐक्यता आहे,जिथे शक्तीयुक्त भक्तांचा गजर आहे तिथे हा रघुराज कायम तिष्ठत असतो.

समर्थ म्हणतात..

रघुराजाच गुणानुवर्णन,शक्तीच संकीर्तन करायला लागलो की वेद,पुराणांची महती,आणि त्यांची भव्यता ही कमी वाटते.वेदातले मंत्र,ओव्या ही खूपच अपुऱ्या शब्दांच्या वाटतात.
असा हा एकमेव रघुराज..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच साहित्यविश्व (भूपाळी) (भाग २)

*समर्थांच साहित्यविश्व..*
*भूपाळी*

*भाग २*

*राम नित्य निरंतरी..*
*राम सबाह्य अभ्यंतरी.*
*राम विवेकाचे घरी..*
*भक्तीवरी सांपडे..!*

समर्थ म्हणतात..

तो रघुराज आहे ना तो नित्यसदा सभोवती आहे.तो श्वासापासून अनुभूतीपर्यंत आणि निश्वासापासून मृत्यूपर्यंत असा सजीवतेभोवती आहे.आणि निर्जीवतेत तो सुप्त चैतन्यमयी आहे..!

समर्थ म्हणतात..

तो रघुराज.. हा बाहेर आणि आत म्हणजे सुकृत,अकृत स्वरूपात विराजित असतो.तसाच शरीर,मनाच्या अंतिम कोषात म्हणजे अंतर्मनात आत्माराम म्हणून सदा सर्वकाळ जागत असतो.

समर्थ म्हणतात..

रघुराज हा स्वतःच एक पूर्ण पुरुष आहे.ज्याने त्याच्या आयुष्यात सत्य,विवेकाचा सर्वतोपरी जगण्यासाठी उपयोग केला.हा विवेक जेंव्हा त्याचे भक्त आचरण करतात तेंव्हा त्याठिकाणी स्वतःच विवेकाचे दैवत म्हणून प्रकट होतो.आणि सगळ्या सहवासितांना ही विवेकाचे धनी करतो.

हा रघुराज नेहमी भक्तमय असतो,जिथे भक्ती विवेकपूर्ण,असक्तीहीन,निरामय,निःसंग असते.राम एक व्रती आहे,ते व्रत म्हणजे भक्तवात्सल्य.रघुराज हा असा भक्तासक्त आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच साहित्यविश्व (भूपाळी) (भाग१)

*समर्थांच साहित्यविश्व..*
*भूपाळी*

*भाग १*

*राम आकाशी पाताळी.*
*राम नांदे भूमंडळी...*
*राम योगीयांचे मेळी...*
*सर्वकाळ तिष्ठत...!*

समर्थ म्हणतात..

आकाशाची व्याप्ती आणि भूमीची खोली..ही रामाने व्यापून आहे.हा राम म्हणजे या दोन्ही ठिकाणी सापडणार अमूर्त चैतन्य.जी आकाशाची निळाई तोच रामरायाचा वर्ण..आणि जी भूमीची सकसता ते रघुराजाचे आशीर्वादात्मक कर्म..!

समर्थ म्हणतात...

रामराय जरी विष्णूचा अवतार,स्वर्गस्थ देवतांचा अंश..पण त्याचा निवास मात्र या भूमीतलावरचे  अचल,चल चराचर आहे.राम इथेच नांदतो.आणि समरसतो.

समर्थ म्हणतात..

रामतत्व जरी मूळ ओंकाराचा आविष्कार असले तरी योगी,तापसी,तपस्वी हे सारे त्यांच्या योगलीलात रामच धारण करतात.असा योगीयांचा,संतांचा समूह म्हणजे रामाच समाजाभिमुख दर्शनच आहे..!

समर्थ म्हणतात...

ज्याच एखाद्यावर प्रेम असत ती व्यक्ती आपल्या प्रियजनासाठी,आराध्यासाठी सदासर्वकाळ वाट बघत असते.रामराय पण तसेच.योगी,संत,महंत, भक्त यासगळ्यासाठी  मनापासून तिष्ठत रहाणं हे जरी त्यांचं इप्सित असलं तरी अस होणं रामकृपाच आहे..!


श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ९)

*समर्थरचित चौपदी*
*भाग ९*

*ब्रम्हअनुभव दे रे राम..*
*अनन्यसेवा दे रे राम..*
*मज वीण तू मज दे रे राम..*
*दास म्हणे मज दे रे राम!*

समर्थ म्हणतात..
खूप झाले आता ऐहिक,सामाजिक,प्रापंचिक अनुभव,खूप झाले.आता नको.रामा आता तो अनुभव दे जो मिळाला की मनुष्य तुझा होतो.तो ब्रह्माअधिष्ठित सोहळा मला माझ्या बाबतीत घडताना बघायचाय..तो ब्रम्हअनुभव दे रे रामा..!

रामराया..मला समाजाची,परंपरेची,धर्माची,देशाची कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करायची बुद्धि आणि कायम संधी दे..!जसा तुझ्या सेवेत,अर्चनेत तुझी मी अनन्यभावाने पूजा करायची अशी इच्छा करतो.तशीच ही सेवा माझ्याकडून करून घेशील ना रे रामराया..?

रामराया.. हे सगळं मी तुझ्याकडे मागतोय पण अस ही होईल ना रे..?हे सगळं मागायच्या ऐवजी तूच मला मिळावास.म्हणजे ही पावनभिक्षा मागायची वेळच येणार नाही.तूच दाता आणि तूच भोक्ता..!आता मात्र हीच भिक्षा दे रे रामा...!

रामराया..शेवटी तुझाच तर मी आहे.तुझा दास,तुझा अश्रीत आहे.तू देशील ते मी घेईन..तू सांगशील तेच आचरण करेन..!त्यामुळे ही पावनभिक्षा मला दे किंव्हा तू स्वतःला मला देऊन टाक. मला रामरूपी करून घे..!आता हे तरी कर ना रे रामा..!

समर्थ पावनभिक्षेची याचना आणि हट्ट हे दोन्ही करतात.अनंताची अक्षयी मागणी..!समर्थ हे लिहिताना त्यांच्यासाठी हे सगळं मागत असतात.पण कळत की आपल्याला ह्या  पावनभिक्षेची जास्त आवश्यकता आहे.खर म्हणजे समर्थ हे सगळं आपल्यासाठीच तर रामाकडे साकडं घालतायत..!आपण झोळी सदा उघडी ठेवूया आणि समर्थांकडे,रामाकडे हीच पावनभिक्षा मागूया..!
मजविण तू मज दे रे राम..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ८)

*समर्थरचित चौपदी*
*भाग ८*

*तद्रूपता मज दे रे राम..*
*अर्थारोहण दे रे राम..*
*सज्जनसंगती दे रे राम.*
*अलिप्तपण मज दे रे राम..!*

समर्थ म्हणतात..

रामराया..
एकाग्रता मनाची दुर्लभ पण छान अवस्था.त्यातुन जन्म घेते तद्रुपता..!तनुमनुचे भाव एक होणं.लिन होणं.स्वतःला विसरून स्वतःतल्या तुला जागत ठेवण,म्हणजे तुझ्याशी तद्रुपता..!ती तद्रुपता रामा मला दे रे..!!

रामराया...तुझी अनेक वचन,तुझी अनेक स्तोत्रे, तुझे अनेक गुणवर्णन हे मला पामराच्या बुद्धीत प्रतीत होऊ देत.त्या त्या शब्दांचे नेमके अर्थ,त्यातील गुह्यता,गूढता,मतितार्थ हे सगळं माझ्या आकलनशक्तीला कळत राहोत.असा अर्थारोहणाचा व्यासंग मला मिळू दे रे रामा..!!

रामराया..तुला माहितीये तुझ्या आसपास तुझ्या भोवती मी असतो त्याचे श्रेय माझ्याभोवती असलेल्या सश्रद्ध,सुहृद,सुस्वभावी सज्जनांना आहे.माझ्यापर्यंत जे मला हितकारक नाही ते पोहचतच नाही.त्यासाठी हीच सज्जनांची मांदियाळी माझ्या भोवती नेहमीच असू देत रे रामा..!!

रामराया..सगळं देतोस.मुक्तपणे देतोस.त्याबरोबर मला अलिप्तता पण दे.कोणत्याही कार्याची उभारणी,स्वबुद्धीचा अभिमान वाटू लागेल इतकं त्यात मला गुंतवू नकोस.मला तिथून लगेच अलिप्त कर.तरच मी निरक्षीर विवेकाने स्वतःला तुझा दास म्हणवून घेऊ शकतो.ते स्वतःसाठी पोषक असलेलं अलिप्तपण मला दे रे रामा..!

समर्थांचा पिंड मूळ संन्यासाचा.पण अशा प्रकारचा पूर्ण संन्यास घेऊन काहीश्या कर्मठ आणि कठीण संन्याशीव्रतामुळे  लोकांच्या कडून जो समाज घडवून घ्यायचा आहे तो घडवून घेता येणार नाही हे त्यांनी ताडल होत.म्हणून त्यांनी समाजात राहून समाजाभिमुख संन्यास शिकवला.अलिप्तता शिकवली.अभ्यास शिकवला.भक्तीला नवीन परिमाण दिलं.रामी रामदासी झाला.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ७)

*समर्थरचित चौपदी*
*भाग ७*

*पावनभिक्षा दे रे राम..*
*दिनदयाळा दे रे राम..*
*अभेदभक्ती दे रे राम..*
*आत्मनिवेदन दे रे राम.!*

समर्थ म्हणतात..

रामराया..तू माझ्या मनाच्या झोळीत घालशील ती केवळ अपूर्व भिक्षा असेल.तुझ्या पावन हातून,पावन मनातून,पावन आशिर्वादातून जे मिळेल ती पावनभिक्षा माझं पूर्ण कल्याण करेल रे रामा..!

रामराया...ही पावनभिक्षा तू देशील कारण तू तितकाच मनाचा कनवाळू, दयाळू आहेस.आणि या भिक्षेचा उपयोग मी तुझ्याच संकीर्तनासाठी करणार आहे.हे सगळं तुझंच  आहे,तुलाच देणार आहे रे रामा..!!

रामराया..या साठी पराकोटीची एकाग्रता जी  तुझं ध्यान,मनन मनात साठवू शकेल,जागवू शकेल..!ती भक्ती मला दे..!अशा भक्तीत कुठलाही भेद निर्माण होत नाही..!कोणीही कितीही आशंका निर्माण केल्या,तुझ्याबद्दल अविश्वास व्यक्त केला तरी माझी भक्ती अढळ राहील ह्याची ग्वाही मी तुला देतो..पण तू मला तशी भक्ती साकारून दे रे रामा..!!

रामराया..मी तुझ्याकडेच व्यक्त होऊ शकतो.माझ्या मनाचा कोपरा न कोपरा मी उलगडून दाखवून त्यातली ममता आदी भावनांची आहुती तुझ्या चरणावर ठेवली आहे.मी माझं अस अस्तित्वच ठेवलं नाहीये.स्वतःला तुझ्यापायी समरसून घेतोय..फक्त तू आता मला उराशी कवटाळून घेशील ना रे रामा..!!

समर्थानी एक सुंदर शब्द प्रचलित आणला पावनभिक्षा..!देणारा दातृत्वाने पावन..घेणारा भक्ती आचरून पावन..ही भिक्षा ही अनादीकाळा पासून सदापुनितच आहे.
ही भिक्षा हे घेणारे समर्थांसारखे युगपुरुष, देणारा युगनिर्माता..!आणि आपण त्या भिक्षेचा आस्वाद घेणारे पांथस्थ,भिक्षुक..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ६)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग ६*

*प्रबंध सरळी दे रे राम..*
*शब्द मनोहर दे रे राम..*
*सावधपण मज दे रे राम*
*बहुत पाठांतर दे रे राम.*
*दास म्हणे रे सद्गुण धाम*
*उत्तम गुण मज दे रे राम.!*

समर्थ म्हणतात...
रामराया मला तुझं उत्तम संकीर्तन करायचं आहे.मला त्यासाठी तुझी,सर्व पौराणिक विषयांची,ऐतिहासिक घटनांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे विवेचनात्मक सादरीकरण मला करता आलं पाहिजे.या सगळ्याची उत्तम ओळख तू मला करून दे रे रामा..!

रामराया...
तुझं अस्तित्व,तुझं दर्शन,तुझ्या लीला या सगळ्याच सर्वांगसुंदर आहेत.त्या सगळ्यांच वर्णन करण्यासाठी माझ्याकडे  तितकीच सुंदर,व्यक्त शब्दमाला असायला पाहिजे.ही शब्दसंपत्ती मला तुझ्याशिवाय कोण देणार?ती ही मला दे रे रामा..!

रामराया..
इतकं असून सुद्धा मी मूढमती आसल्यामुळे माझ्या हातून तुझ्या संकीर्तनात अनेक चुका होतात,त्रुटी रहातात..तू मला नेहमी सांभाळून घेतोसच..पण अशा माझ्या चुका मला सावधपणे सुधारून पुन्हा धीट पणे तुझं संकीर्तन चालू ठेवता आलं पाहिजे अस प्रसंगावधान मला शिकवशील ना रे रामा..?

रामराया...
तुझं चरित्र म्हणजे एक दीर्घ मनोहर अशा प्रसंगांची शृंखला आहे.त्यात प्रत्येक कृतीतून तू आम्हाला शिकता येतील अशी वचने आहेत.त्याबरोबरच वेदांत,पुराण,उपनिषदे यांतील श्लोक,ओव्या,स्तोत्रे अस अनेक वैभव आहे.हे सगळं माझ्या मतीमध्ये समावेल इतकं पाठांतर माझ्याकडून करवून घेशील ना रे रामा..?

रामराया..मी तुझा अंकित आहे,दास आहे,ऋणी आहे.पण तू मात्र सगळ्या सद्गुणांची,सदवर्तनाची,सदाचाराची खाण आहेस,मेरुमणी आहेस.तू सकल विश्वाचा आदर्श आहेत.विश्वाचा विश्राम आहेस..!हे तुझं वर्णन खूपच थोड आहे.इतका तू अगाध आहेस रे रामा..!

रामराया..
तुझं वर्णन हे गुणवर्धन आहे.पण मला त्यातल जेवढ काही उत्तम आहे ते मला दे ना रे..!मी मनापासून प्रयत्न करेन.मी आचरण करायचा प्रयास करेन.पण मला जे उत्तम,जे सत आहे असे सगळे गुण मिळावेत हे मागण तुझ्याकडे कायम राहील.या दासावर ही कृपा करशील ना रे रामा..?

समर्थ स्वतःला कायम घडवत आहेत.स्वतःच्या उत्तम अशा अस्तित्वाला हेतुपुरस्सर उत्तरं रित्या रचत आहेत.अशी बहुआयामी प्रतिभा समर्थांची आहे.रामाकडे निस्सीम भक्ती करून,मागणी करून त्यांनी ती घडवली आहे..!आपल्यासमोर ही तोच आदर्श आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थरचित चौपदी (भाग ५)

*समर्थरचित चौपदी..*
*भाग ५*

*रसाळ मुद्रा दे रे राम..*
*जाडकथा मज दे रे राम*
*दस्तक टाळी दे रे राम..*
*नृत्यकला मज दे रे राम!*
समर्थ म्हणतात..

रामराया.. माझं दिसण,माझ्या चेहऱ्याची ठेवण ही जन्मापासून आहे.त्यात बदल करता येत नाही.पण त्यावर सुखाची,अध्यात्माची,भक्तीची अभा असू दे..!माझ्या मुद्रेवर शांत,हसरा असा भाव असू दे..!माझ्याकडे बघून कुणालाही माझा कंटाळा येऊ नये..!कारण या मुखातून तुझीच रामकथा मला त्यांना समजावून द्यायची आहे..!

रामराया..मला संकीर्तनात तुझ्या,वेदांतामधल्या,पुराणामधल्या,इतिहासातील गूढ,गर्भित शिकवण असलेल्या कथांचा सहजतेने उलगडा करता आला पाहिजे..त्यासाठी अशा सर्वविषयातील कथा मला समजून घेता येतील अशी बुद्धि तू मला दे रे रामा..!!

रामराया..या संकीर्तनात मला उत्तम ताल ज्ञान ही असायला हवं.माझी आणि भोवतीच्या वाद्यांची,एकमेकांची मधुर अशी एकता जमली तर तुझी रामकथा अजूनच मनोवेधक होईल.तसेच श्रोत्यांना ही या तालाशी समरस करून घेण्याची कला अवगत करून दे रे रामा..!

रामराया..तुझं संकीर्तन चालू असताना तुझ्या अनेक अवतारांच्या कथाही प्रसंगानुरूप येतातच.अनेक ठिकाणी तुझ्या भजनात तल्लीन होऊन आम्ही पदन्यास ही करतो,नृत्य करतो..!मला त्याच ही उत्तम ज्ञान दे..!ती ही तुझी सेवा च आहे..!ती मला मनोभावे शिकवशील ना रामराया...?

समर्थ उत्तम धर्मज्ञानी आहेत,संस्कृतीज्ञानी आहेत तसे उत्तम मिमांसक ही आहेत.ते उत्तम प्रवचनकार,कीर्तनकार,गायक ही आहेत.रामदासी म्हणवुन घेणाऱ्या प्रत्येकाला हे सगळं अवगत हवं,आणि ते ही अतिशय नेमकेपणाने हा ही त्यांचा आग्रह आहे.म्हणून या सगळ्या गुणांची मागणी समर्थ रघुराजा कडे करत आहेत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२