समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे)*

🌺
*कोडे नको रे कळहो नको रे..|*
*कापट्य कर्मी सहसा नको रे..|*
*निर्वाणचिंता निरसी अनंता..|*
*शरणागता दे बहु धातमाता..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..आयुष्य असे भक्तीचा सरळ प्रवाह असावे.त्यामध्ये कोणतंही संकट नको.विकल्प नको.त्यामध्ये कोणताही विरोध आणि विरोधाभास नको रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..जगताना व्यवहार करताना छोटामोठा कुटीलपणा,आपमतलबीपणा करावा लागतो तो ही शक्यतो मला करायला लागू नये इतकं निर्मळ आयुष्य मला दे रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मनुष्याला सगळ्यात मोठी चिंता,भय  असते ती मृत्यूची..!त्या मृत्यूच भय वाटावं इतकी मनाची साशंकता,तुझ्या भक्तीबद्दलची अनास्था होऊ देऊ नको रे..!

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी तुला शरण आलो आहे.या शरणागत अवस्थेत तुझी भक्ती हीच मला तरणोपाय आहे.ही भक्ती,ही उपासना करण्यासाठी तुझ्या निर्गुण रूपातील काही कल्पित लीळा आणि तुझे घडलेले मूळ चरित्र याची ओळख मला करून दे रे..!

समर्थ रामरायाकडे आयुष्य सफल आणि भक्तीपूर्ण होण्यासाठी कृपा मागत आहेत.आणि त्यासाठी अखंड शरण्यभक्तीची ही अपेक्षा करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनाथदासा कल्याण व्हावे..|*
*अती सौख्य व्हावे आनंदवावे..|*
*उद्वेग नासो वर शत्रू नासो..|*
*नानाविळासे मग तो विळासो..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..माझ्यासारख्या रामदासांचे कल्याण व्हावे.जे कल्याण तुझी भक्ती करत तुझ्यात लिन व्हावे,समर्पित व्हावे..एकरूप व्हावे यात आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ही रामकृपा आमच्यासारख्याच सर्वोच्च सुख आहे.इतर कोणत्याही ऐहिक सुखापेक्षा ही कृपा लाभण हे मला सुखासिन जीवनाची आनंदवल्ली वाटते आहे.ती मला मिळू दे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..तुझ्या या आनंदलहरींनी माझ्या मनातली दुश्चित्तता निरसून जावी.माझ्या मनातले शत्रूरूपी विकल्प आहेत ते नाश होऊ देत.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. एकदा तू माझ्या मनाला,तनाला माहिती झालास की मग माझ्या प्रत्येक सुखात,प्रत्येक आनंदात तू सुखवल्ली म्हणून विराजमान हो.म्हणजे हे सुख अक्षय होईल.

समर्थ रामाप्रति असलेल्या कृपेची अपेक्षा रामाला सांगतात. आणि त्या सुखाच्या योगाने प्रत्येक क्षणी,प्रत्येक आनंदात रामाला वसायची विनंती ही करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*देवे दयाळे करुणा करावी.|*
*भक्ताभिमाने भरणी भरावी..|*
*हे रामनामी तरणी तरावी..|*
*दासा समस्ता वरणी वरावी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

देवाधिदेवा..तू दयाळू आहेस.तू कनवाळू आहेस.तू तुझ्या या ब्रिदाला जागून माझ्यावर दया कर.तुझी करुणापूर्ण नजर माझ्याकडे वळवून मला कृपांकीत कर.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया..माझं मन हे भक्तीने भरून दे.त्याची क्षणाक्षणाने वृद्धी कर.इतकी की भक्तीशिवाय,तुझ्या उपासनेच्या वृत्ती शिवाय कशालाही या मनात जागा ठेवू नकोस.इतकं मन भारून जाऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया,रामराया मला अशी बुद्धि दे की तुझं नाम हे अशी नाव होईल जी हा भवसागर सहज पार करून मला पैलतीरावर,तुझ्याकडे घेऊन येईल.इतकं नामाच अधिष्ठान दृढ होऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवराया..माझी दास्यभक्ती अजून दृढ करून घे.माझ्या भक्तबुद्धीने तुझ्या पूजनाचा योग मला वारंवार प्राप्त होऊ दे.आणि सर्वांग,सगुण,निर्गुण पूजनाचा संकल्प माझ्याकडून सदा होऊ देत.

समर्थ देवाकडे,रामाकडे अपेक्षा करतात की तुझी भक्ती,तुझं पूजन ही मूलतः सवय होऊ दे.तीच माझी दिनचर्या होऊ दे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सीवर्णा मनाचा विपरीतवाणा..|*
*उदास वाटे बहुसाल प्राणा..|*
*मग राघवा रे तुज वाहिलो रे..|*
*कृपाळूवे सत्वर पाहिलो रे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..भवभयाने जेंव्हा मी गलितगात्र होतो,मनाची अवस्था ही अतिशय विकल होते.जगणं असार होऊ लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..या विपरीत काळामुळे माझी भावनिक,मानसिक अवस्था अतिशय दोलनामय,करुण होऊन जाते.आणि कुशंकीत होऊन जाते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..ही अवस्था आल्यावर मी तुझ्यासाठी,तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या साऱ्या इच्छा,आकांक्षा याचा त्याग केला आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा,आता फक्त तुझ्या सत्वर समीप बोलावण्याची,तुझ्या कृपेची मी यथावकाश वाट पहातोय. ही कृपा माझ्यावर करशील याची खात्री आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*ऋषी तापसी योगरासी विळासी..|*
*मनी चिंतिती राम लावण्यरासी..|*
*असंभाव्य त्या कीर्तिच्या किर्तीढाला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट जाला..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

नामात,भक्तीत तल्लीन झालेले भक्त,तपश्चर्येत लिप्त झालेले तापसी,अनेक सत्पुरुष घडवणारे ऋषीजन,हटनिग्रही साधुजन.. आणि त्याबरोबरच संसारात राहिलेले सांसारिक...!

समर्थ रामदास म्हणतात..

हे सारे येनकेन प्रकारे भक्ती,उपासना करून पुण्यसंचय करत आहेत.रामरायांची सगुण आणि मानसपूजा करत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्यातून अपरिमित अशी कीर्ती पावलेल्या किर्तीनरेशाला,रामरायाला  पाहून,त्याच मनभावन अस दर्शन घेतलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रामप्रभूंना पाहून मन,शरीर,आयुष्य सारे पुलकित झालं आहे.आणि या उत्तम योगाने मी आनंदाची परिसीमा अनुभवतो आहे.

समर्थ त्यांच्यासाहित सगळ्यांच्या चिंतनात,मननात,स्मरणात असलेल्या रामाच्या प्रत्यक्ष दर्शनाने अतिशय आनंद पावलेले आहेत.आणि वरील पाच ओव्यात ते ही भावना व्यक्त करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)*

🌺
*जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा..|*
*सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्गवाटा..|*
*प्रतापेचि त्रैलोक्य आनंदवीला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामप्रभु हा सर्वोच्च देव आहे ज्याने सगळ्या देवांना सत्वाचे आदर्श निर्माण करून दिले.आणि त्या सत्वाच्या महिरपीत देवत्व सिद्ध केलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामप्रभुने त्याचे आदर्श दाखवून,त्यावर सज्जन लोकांना स्वर्गलोकीच्या सुखकर वाटा त्यागाने आणि सत्वबुद्धीने सुकर केल्या आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामप्रभुने असुरांशी युद्ध करून,असत्य,असत्व यांचा पराक्रमाने पराभव करून या त्रैलोक्यात आनंदवनभुवन प्रस्थापित केले आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा रामरायाचे दर्शन आज  करून मनाचा गाभारा सुखाने भरून जातो.त्यामुळे मनाची,आयुष्याची तृप्तता पूर्ण होते आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

🌺
*दीनानाथ विख्यात हे नाम साजे..|*
*प्रजापाळकू रामराजा विराजे..|*
*बहु सुकृतीचा बरा काळ आला.|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला.||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या रामराजाचे हृदय हे कोमल आणि दयावंत आहे.तो गरीब भक्तांसाठी  त्राता आणि कृपावंत आहे.याची कीर्तीच मुलतः दीनानाथ या नावाने सर्वदूर पसरली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामप्रभू सर्व सृष्टीचा आत्मा ही आहे आणि तो या समग्र सृष्टीचा पालक ही आहे.समस्त सजीवासाठी हा रामराया सर्वहीतदक्ष आणि पालक असा आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायांचे असे सुलक्षण दर्शन होणे हा योगायोग निश्चित नाही.किंव्हा ठरवून झाले आहे अस ही नाही.हे सगळं माझं शुचित पूर्वकर्माच फळ म्हणून मला मिळालं आहे.आणि त्यामुळेच मला हे सुखाचे दिवस दिसत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

असा सुरंजनी रामप्रभू मला माझ्या नजरेने अनुभवता येतोय.मला माझ्या ज्ञानेइंद्रियात साठवता येतोय ह्याने मन अतिशय आनंदित होतय.

समर्थ या पंचवटीच्या काळाराम मंदिरात येऊन दर्शनाने भारावून गेलेले आहेत.आणि तो त्यांचा आनंद त्यांनी या ओवीतून व्यक्त केलेला आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लीळाविग्रही देव ब्रह्मदिकांचा.|*
*सदा बोलणे चालणे सत्य वाचा..|*
*जया चिंतिता चंद्रमौळी निवाला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*

समर्थ रामदास म्हणतात..

रामप्रभु ही देवता स्वतःच्या सत्वगुणी लीळेमुळे पूर्ण देवाधिकांचे आराध्य बनली आहे.रामरायांचे सत्वच इतके तेजल आहे की त्याची उपासना ब्रह्मदिक देवतांनी केली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे बोल मधुर तर  आहेच पण याशिवाय त्याचे  अस्तित्व सत्वगुणी असल्यामुळे,आणि त्याचे वचन ही अतिशय बहुश्रुत आणि समाजकल्याणीच असते.

समर्थ रामदास म्हणतात..

शिवशंकराने प्राशलेले हलाहल ज्याच्या केवळ नामोच्चरणाने शीतल झाले असा हा रामचंद्र शीतलतेचे प्रतीक आणि उगम ही आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामराय दर्शनाचे कृतार्थ असे फळ देतो ज्याने रामदास,भक्त संतुष्ट होतात..!आणि ते जन्माचे सार्थक करतात.

समर्थ रामदर्शनाचे फळ समजावून सांगतात.आणि त्या रामदर्शनाने त्यांना मिळालेल्या सकृत आणि अंतिम समाधानाचे ही वर्णन करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्रोत्र-७

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-७*

🌹🌺
*नटवर नटनाट्ये नाट्यनटवांगसंगी..|*
*गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी.|*
*अभिनव नटलीळा रंगणी रंग माजे..|*
*चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणेश रंग भरू लागला की श्रीकृष्णासारखा सर्वव्यापी नटवर होतो.ह्याच्या प्रत्येक लीळातून एक कथा,एक सुरस नाट्य निर्माण होते.किंबहुना त्याच्या लयबद्ध पद्न्यासाने त्याचे दर्शन हे एका अविरत मयसभेसारखेच भासत.

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणराज गजवदनी आहे.त्यामुळे त्याच विघ्ननाशक दर्शन हे एका गूढ अशा भाववृत्तीच तसेच अतिशय वैविध्यपूर्ण अशा गुणप्रभावाच द्योतक आहे अस जाणवत.

समर्थ रामदास म्हणतात..

या गणेशाच्या अनंत आणि नवनवीन लिलांनी एक अपूर्व,अकल्पित आणि अविरत अशी सुख, समाधानी अशा प्रसंगाची शृंखला आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर घडते किंव्हा तो ती घडवतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाच्या लयबद्ध हालचाली इतक्या सुयोग्य आणि नेमक्या असतात की त्या सर्व नटराज स्वरूपातील सुखतांडवाने सुखाच्या कल्लोळाने विश्व आणि त्यामुळे आपले मन हे उल्हसित होऊन जाते.

समर्थ या ओवीमध्ये गणपतीच्या नटराज रुपात वर्णन करतात. त्याच हे सुख नर्तन भक्तांच्या आयुष्यात सुखाचा पदन्यास करत याच प्रकटीकरण समर्थ या ओवीत करून देतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र-६

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-६*

🌹🌺
*गजवदन विराजे रंगसाहित्य माजे..|*
*रतिपतीगती लाजे लुब्ध कैळासराजे..|*
*फरश कमळ साजे तोडरी ब्रीद गाजे..|*
*सिद्धी बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

गणराज हा प्रसन्नमुखी,गजवदनी इतका विशाल आणि प्रफुल्ल दिसतो की त्याच्या अस्तित्वाने सभोवतीच्या वातावरणात एकप्रकारचा सुखाचा उन्माद असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा उन्माद इतका लुब्ध आणि आनंददायक असतो की रति-कामदेवाचा शृंगारगंध ही इथे कमी वाटतो.आणि त्या आनंदसंगात कैलासाधीपती गुंग होऊन जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजवदनी चेहऱ्याभोवती हाती धरलेले परशु,कमळ त्या मुखकमलाची शोभा वाढवतातच पण त्याबरोबर हातातले तोडर हे त्या दर्शनाचा आनंद द्विगुणित करतात.

समर्थ रामदास म्हणतात..

हा गजानन सिद्धी आणि बुद्धीच्या संगतीने एक पूर्ण असे विश्वोद्धार करणारा असा स्फुल्लिंग असा जाणवतो.ज्यापासून सकळ विश्वउत्पत्ती होते आणि जिथे विश्व लय ही पावते.

समर्थ गणपतीचे संकुटुंब वैश्विक रूप इथे प्रकट करतात.आणि त्याच दर्शन हे किती सुमोहक आहे याचं वर्णन ही या ओवीत करतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्रोत्र-५

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-५*

🌹🌺
*ध्यानी धरील नरकुंजर बुद्धिदाता..|*
*त्याची फिटे आवलीळा सकल चिंता..|*
*आधी गणेश सकळा पुजणेचि लागे..|*
*दासा मनी तजविजा आवजा न लागे..||*

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाचे पद्मासन स्थितीतील ध्यान(नरकुंजरी अवस्था) खूपच मनभावन आहे..!तसच ध्यान जो धरेल त्याची साधना ही यथावकाश फलद्रुप होते.

समर्थ रामदास म्हणतात..

असे नरकुंजरी ध्यान मनात  धरल्याने आयुष्यात उठलेले समस्त विकल्प,सगळ्या चिंता,सगळी संकटे निवारण होऊन तो भक्त सुखी होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाचे पूजन,ध्यान सर्व भक्त,तापसी,साधू,संत यांनी करणे हे इष्ठच असते.हे सर्वप्रथम करण्याने त्यांचं इच्छित कार्य अतिशय  सुलभतेने पूर्ण होते.

समर्थ रामदास म्हणतात..

हे गजाननाचे नरकुंजरी  चिंतन प्रत्येक भक्ताला चिंता आणि भय यापासून मुक्त करते.आणि ह्या साऱ्या भावनांपासून त्याचे अस्तित्व कायमच अबाधित रहाते..!

समर्थ रामदास गणपतीचे नरकुंजरी रूप इथे प्रकट करतात.हे गणेशाचे ध्यान दुर्लभ पण मुक्तीदाते  आहे.आणि त्याच्या उपासनेच फलित इथं सांगतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र -४

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-४*

🌹🌺
*वीतंडसा बलदंड गिरीतुल्य धावे..!*
*भक्तांसि रक्षित रिपूवरी तो उठावे..|*
*अंदुस तोडरगुणे करितो चपेटा..|*
*गर्जीन्नल्या घणघणाट प्रचंड घंटा..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

अत्यंत विशाल रूप घेऊन  हा गजानन पूर्ण ताकदीने पर्वतप्राय असा विश्वरूप अवतार घेऊन प्रकट होतो,धावून येतो..!

समर्थ रामदास म्हणतात..

असा गजानन विराट रुपात भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी सचेत असतो.त्याच हे भीमरूप हे विघ्नावर  कर्दनकाळ बनून एक प्रहार होऊन त्यातून भक्त आणि सज्जनांच रक्षण करणार ठरत..!

समर्थ रामदास म्हणतात..

गजाननाचा हा आघात अतिशय न्यायप्रिय असतो.तो भक्ताला कळू न देता त्याच संरक्षण करतो.आणि त्याच्या विषम परिस्थितीवर नियंत्रण आणून भक्ताला सुखी करतो.

समर्थ रामदास म्हणतात...

या गजाननाच येणं हे इतकं प्रचंड अशा ध्वनांकीत अस्तित्वात येत की सहस्त्रावधी घंटानाद चालू आहे अस जाणवत.ह्या उदंड ध्वनीनेच विघ्न पळून जातात.

समर्थ गणपतीचे विराट,भव्य अस विश्वरूप इथं वर्णन करून सांगतात.भक्तांच्या विघ्नहरणासाठी त्याची भक्तवत्सल तत्परता किती भेदक आहे हे त्यांनी या ओवीत समजावून सांगितलं आहे.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र-३

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-३*

🌹🌺
*फर्सा पुसुनि सरसावतसे अघाला..|*
*भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला..|*
*साठीसहस्त्र गण त्यांसरीसा निघाला..|*
*मूषकवाहन करी दुरितासि हाला..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

परशु हाती बाळगलेला गणराज जेंव्हा तो परजून एखाद्या विघ्नावर चाल करून जातो तो जाणारा गणराज रणवीर स्वरूपातला रुद्र भासतो.

समर्थ रामदास म्हणतात..

भक्तांच्या पुढ्यात जेंव्हा एखादे विघ्न निर्माण होत..रचल जात..!तेंव्हा त्या विघ्नाचा त्याचक्षणी नायनाट करण्याचं कसब या गणराजाकडे आहे.त्याचा आवेग हा त्या विघ्नाकर्त्याला कधीच सहन होत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

साठ हजार या गणराजाचे गण आहेत.हे गण म्हणजे त्याच सामर्थ्य आहेत..!या सगळ्या सामर्थ्यवान चालीसह हा गणराज अतिशय वैभवशाली स्वरूपात विघ्नकर्त्यावर चाल करून जातो.

समर्थ रामदास म्हणतात...

हा मूषकवाहन असलेला गणराज जेंव्हा एखाद्या विघ्नावर,दुराचाऱ्या वर चाल करून जातो तेंव्हा त्या विघ्नाला,दुरीताला त्राही माम करायची वेळ येते.

समर्थ या गणराजाचे सामर्थ्य या ओवीत समजावून सांगतात.त्याच रणसामर्थ्य,त्याच अस्त्र सामर्थ्य,त्याच वहन करण्याऱ्या मूषकाची वेगशक्ती..!या साऱ्याच मूर्त वर्णन समर्थ या ओवीमध्ये करतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२