समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*मार्तंडमंडप उदंडचि सौख्यकारी..|*
*त्रैलोक्यपावन प्रभू दुरिते निवारी..|*
*ध्यातो सदाशिव अखंडित चापपाणी..|*
*उदंड कीर्ती निगमी महिमा पुराणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा आकाशापासून भूमीपर्यंत व्यापलेला रामराय जेंव्हा त्याच्या सिंहासनावर आसनस्थ होतो तेंव्हा सूर्य आपल्या तेजाने त्याच्या सभेवर अतिशय शीतल अशी महिरप,प्रभावळ आणि मंडप तयार करतो..!खूपच लखलखायमान हे स्वरूप आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या राजसिंहासनी बसून हा तिन्ही लोकांतील समस्त अस्तित्वाच चलन,पालन करतो.अनेक भक्तांच्या अनेक संकट,विकल्पाच पारिपत्य करून त्यांना सुखी करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव स्वतःचा मनातील तृषा आणि कंठातील दाह मिटवण्यासाठी अखंड या रामरायांचा धावा करतो.जप करतो आणि स्वतःला रामरूपात शांत करू पहातो.

समर्थ रामदास म्हणतात..

म्हणूनच या रामरायांची कीर्ती ही अनेक प्रचलित कथांमध्ये वर्णन करून त्याचे गुणगान भक्तांनी गायले आहेच,त्याबरोबरच पौराणिक महिमा,वेदांतात त्याची कीर्ती आणि शिकवण भरून पावली आहे.

समर्थ रामरायाचे विश्वरूप इथे वर्णन करतात आणि ते वर्णन करताना स्वतःही त्या विश्वातेजाशी एकरूप होऊ पहात आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सिंहासनावरि रघुत्तम मध्यभागी..|*
*बंधू तिघे परम सुंदर पृष्ठभागी..|*
*वन्हीसुता निकट शोभत वामभागी..|*
*विलासतो भिम भयानक पूर्वभागी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

रामपंचायतन पहाणे,त्याचे दर्शन घेणे हे केवळ भाग्याचे लक्षण.सिंहमुखी रत्नजडीत मंचकावर हे रामराय जेंव्हा आसनस्थ होतात.तेंव्हा त्यांचं असणं हेच एक पूर्ण सुख असत.

समर्थ रामदास म्हणतात..

त्या रामरायांच्या मागे त्यांची सावली आसलेले तीन बंधू हे एखाद्या अभेद्य क्षितिजपर प्रभावळी सारखे अतिशय तेजपुंज स्वरूपात दक्ष उभे असतात.

समर्थ रामदास म्हणतात...

रामरायांच्या डाव्या बाजूला ती जगन्माता जी अग्नीकन्या आहे..!ती अतिशय दैवी दृष्टीने कृपाकटाक्ष भक्तावर ठेवत ती आसनस्थ आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्या दैवी विभूतींचा सेवक म्हणून धन्यता पावणारा आणि स्वतः कृतार्थ होऊन तसा चिरंजीव जगणारा तो रुद्ररुपी हनुमंत एका अनन्य भक्तासारखा रामचरणाशी गढून आहे.

समर्थांनी उत्तम असे पंचायतन रूप आपल्यासमोर उभं केलं आहे.त्याची त्रिकाळ मानसपूजा करून धन्य होणं हेच आपल्यासारख्या दासांच कर्तव्य आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चपेटा विझे काळमाथा जयाचा..|*
*धरी रे मना पंथ या राघवाचा..|*
*विवेकी जने राजपंथे चि जावे..|*
*तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

ज्याच्या नामाच्या सत्वगुणी आघाताने मनुष्याच्या अदृष्ट भाळी जे काही विघ्नकारक लिहिलं असेल तर त्याच निरसन तो रामराया करतो.असा हा रघुराज..!!

समर्थ रामदास म्हणतात..

अशा या रघुराजाचा सत्वगुणी मार्ग जो अतिशय निरामय अवस्थेत घेऊन जातो.जो पूर्ण जीवन कृतार्थ करतो.त्या रामरायाचा हा भक्तीपंथ प्रत्येकाने आचरण करावा असाच आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्येक सजग दृष्टी असलेल्या,आणि कल्याणाची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या भक्तीच्या राजपथाचा अंगीकार करावा.म्हणजे मनात असलेला विवेक हा अजूनच भक्तीरंगात रंगून जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

ही भक्तीची वाट मनोभावे आचरण केल्यावर तो श्रीहरी,तो रामराय खचितच आपल्याला सगुण आणि निर्गुण स्वरूपात प्राप्त होतो यात संशय नाही..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चमत्कारले चित्त हे रामगुणी..|*
*उठे कीर्ति वाखाणिता प्रीती दूणी..|*
*रघुनायकासारिखा देव नाही..|*
*क्रिया पाहता चोखडी सर्व काही..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराजांच्या कृपेचे अनेक दाखले,कहाण्या,लीला हे ऐकणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाहीत.कारण कल्पनेच्या पलीकडच सुख हा रघुराज आपल्याला देतो.त्यामुळे अपरंपार सुख मनात साठून येते.

समर्थ रामदास म्हणतात...

प्रत्येकवेळी रामराया नवीन असे कृपेचे सागर माझ्यासमोर खुल करतो.आणि ते अनुभवताना माझ्या मनात त्याच्याबद्दलची भक्ती आणि प्रेम दुणावते आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराज हा असा देवराज आहे की जो संयत सहनशक्ती आणि अपूर्व रणशक्ती याचा संयम आहे.याशिवाय वात्सल्य आणि मित्रत्व याचाही एकमेव आदर्श तो एकमेवच आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचा प्रत्येक पराक्रम,प्रत्येक लीला, प्रत्येक कार्य हे रोखठोक आणि समर्पक आहे.त्यात कोणतंही वैगुण्य राहिलेल नाही.इतका तो गुणसंपन्न असा देव आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चळेना समरंगणी ठाण मागे..|*
*चळेना मुखे बोलता वाक्य युगे..|*
*चळेना कृपासिंधु कल्पांतकाळी..|*
*रघुराज हा आदरे दास पाळी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

कोणतंही समरंगण असो जे मनात उठत ते द्वंद्व किंव्हा जे दोन विचारात उठतो तो विकल्प,किंव्हा नीती,अनीती मधील अक्षय लढाई अशा काळात जो दृढपणे सदप्रवृत्त भक्तांच्या मागे उभा राहतो असा हा रघुराज आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराजा ज्याच वचन हे एकवचन म्हणून सुप्रसिद्ध आहे.जे कालातीत,युगातीत आहे.कितीही काळ गेला तरी ते वचन काळांचे, युगांचे पडदे भेदून सुद्धा शुद्ध रहाते.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे रामतत्व असे आहे की कल्पांताचा मेघ जरी भूमीवर प्रकटला तरी या रघुराजाची कृपा करण्याची वृत्ती अबाधित,अक्षय रहाते.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा प्रेमळ रघुराजा अतिशय आत्मियतेने आणि  अखंडपणे दासाची,भक्तांची काळजी घेत आपलं भक्तवत्सल हे विशेषण सिद्ध करत असतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चकोरासी चंद्रोदयी सुख जैसे..|*
*रघुनायका देखता सुख तैसे..|*
*सगुणासी लाचावले स्थिर राहे..|*
*रघुनंदनेवीण काही न पाहे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

चंद्रोदयाच सुख सर्वात जास्त चकोर पक्षाला असते कारण चंद्रकिरणे ही त्या चकोराची खरी भूक असते. गरज असते.ज्याने तो अंतर्यामी केवळ आनंदसागर अनुभवत असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

असेच अमाप सुख मला होते जेंव्हा मी रामरायांचे मुखदर्शन घेतो.तो कृपासागर राम आपल्या मनात एकरूपतेचा,स्नेहल आशीर्वादाचा अवघा मेघ रिता करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगुण दर्शनाला हे मन अतिशय अधीर आहे.केवळ त्यासाठी अतिशय लालची होऊ पाहतय.आणि ही भक्तीची लालूच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामरायांच्या सगुण भक्तीचा नाद आता इतका मधुर वाटू लागला आहे की त्याशिवाय हे मन कुठेही स्थिर होत नाहीये.कुठेही रुळत नाहीये.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लघुलाघवी राम कोदंडधारी..|*
*मनी चिंतिता शोक संताप हारी..|*
*महा संकटे नाम घेता निवारी..|*
*भवसागरी मूढ पाषाणतारी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

अत्यंत दृष्टीला ला प्रिय आणि लोभस असा हा रामराय.. जो त्याच्या आशिर्वचनी नजरेमुळे अत्यंत जवळचा वाटतो तसा हाती धरलेल्या कोदंड धनुष्यामुळे त्याच रणधीर स्वरूप ही अत्यंत कर्तृत्वशाली वाटत.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रघुराजाच चिंतन केलं की शोकरूपी विकल्प,संतापरुपी विघ्न लयाला जाऊन मनात केवळ सात्विकतेचा वास सुरू होतो.या सात्विकतेमुळे वाईट असे जे काही सभोवती असेल त्याचा नाश होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

घनघोर संकटे,विषमकाळाचे राक्षस हे या रामराया चे नुसतं नाम घेतलं तरी भक्तांपासून दूर होतात.तो रघुराज त्या सगळ्यांच निरसन केवळ दृष्टीफेक करून टाकतो.

समर्थ रामदास म्हणतात..

भवसागरातल्या प्रत्येक अडकलेल्या मुमुक्षुला, शिळारुप अशा मूढ वृत्तीला हे रामनाम सुखपुर्ती मिळवून देते.साफल्याचा किनारा मिळवून देते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लपावे अती आदरे रामरूपी..|*
*भयातीत निश्चिंत ये सस्वरूपी..|*
*कदा तो जनी पाहता ही दिसेना..|*
*सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

आपण निश्चित या रामस्वरूपाच्या संकीर्तनात लपून जावे.आश्रय घ्यावा.कारण त्याची छाया असेल तर कोणतीही अपशक्ती आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

हे स्वरूप अतिशय कल्याणकारी आहे.ते मानवाला त्याच्या मनात येणाऱ्या प्रत्येक भीतीच्या पलीकडे घेऊन जाणार अत्यंत दिलासादायक अस मेघवर्णी रूप आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

जेंव्हा हे रामतत्व आपण शोधू लागतो ते आपल्या दृश्य चक्षूनी ते दिसू शकत नाही.ते आपण शोधू शकत नाही कारण ते आपल्यातच वसलेलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अस एकदा रामतत्वाशी तादात्म्य पावलो की त्याच भिन्न अस स्वरूप रहात नाही.कारण तो राम आणि आपण एकंकार होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लगा पाहता राघवेवीण नाही..|*
*निराधार हे पाहता सर्व काही..|*
*चळेना जनी तोचि आश्रो धरावा..|*
*रघुराज आधार त्याचा करावा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामरायाचा आश्वासक सहवास पाहता आधार ज्याला म्हणावा अस फक्त हाच असू शकतो.कारण हा रामराजा स्वतःचे अबाध्य ओज हे दासाच्या कल्याणासाठी सदा खर्च करत असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

एकदा रामरायांच्या या आधाराचा,साथीचा अनुभव घेतला की कळत यांच्याशिवाय कोणताही आधार हा मनुष्याच आत्मिक,भावनिक कल्याण करू शकत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया ज्या अचल,निग्रही स्वरूपात नेहमी दर्शन देतो तसाच त्याचा भक्ताच्या मागचा एक आधार ही असतो.असाच न ढळणारा आधार समस्त मनुष्याच्या  मागे असला पाहीजे.

समर्थ रामदास म्हणतात..

म्हणूनच रामरायाच्या नामाचा,संकीर्तनाचा आणि त्याच्या आशीर्वाद,एकरूपतेचा आधार मला कायम मिळत रहावा आणि चिरंतन टिकावा ही प्रार्थना..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लळे पाळीतो राम आम्हा दिनाचे..|*
*कृपासागरू भाव जाणे मनाचे..|*
*नुपेक्षी कदा संकटी घाव घाली..|*
*तया देखता मानसे ती निवाली..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज जेंव्हा येतो तेंव्हा वात्सल्याने मातापित्या सारखे माझे निरागस हट्ट पुरवतो.प्रेमाने निरसन करतो.मी कितीही त्याच्याकडे मागितल तरी तो माझी आवड पूर्ण करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज कृपावंत इतका आहे की तो माझ्या मनात उठणारे प्रत्येक तरंग  मनस्वी पणे जाणून घेतो आणि त्याची मला सुखकर अशी व्यवस्था करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज कुठल्याही अपेक्षेविना माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निरसन करतो.त्याचे सुखात परिवर्तन होईल अशी माझी जीवनशैली करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या रघुराजाचे दर्शन घेतले की मनातले विकल्प शांत होतात.ईच्छा तृप्त होतात.मन सफल सम्पूर्ण अवस्था प्राप्त करते. एक तृप्त शांतता मन भरून पावते.

समर्थ चाफळला येऊन वसणाऱ्या रामरायाच गुणगान करताना त्याच्या अस्तित्वाचा त्यांच्यावर किती हळुवार पण सुखकर परिणाम होतो हे सांगत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लवे नेत्रपाते स्फुरे आजि बाहे..|*
*दीनानाथ हा राम येणार आहे..|*
*जयाचेनि योगे सुखानंद लोटे..|*
*तया देखता अंतरी बाष्प दाटे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

डोळ्यांची पापणी लवते आहे.हा शुभसंकेत आहे.हे शुभवर्तमान येणारा काळ घेऊन येणार आहे.अचानक केवळ जाणिवेने बाहुत,गात्रात स्फुरण चढून ते हर्षोउन्मादीत होत चालले आहेत..!

समर्थ रामदास म्हणतात...

तो राम जो सर्वउद्गारक,सर्वतारक सर्वकृपाळू आहे,त्याच आगमन आता निश्चित आहे.हे या साऱ्या शुभशकुन आणि शुभचिंतनाने खर ठरत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

तो रामराय आला की सौख्याचे सोहळे सुरू होतात.सगुणरूपाचे संकीर्तन चालू होते.भक्तीसागरातून आनंदसागराचा प्रवास सुरु होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या रघुराजाचे केवळ मुख दर्शन घेतले की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात.मन,हृदय भक्तीने उचळंबून येते.आणि अधीर होऊन स्निग्ध,मुलायम होऊन जाते.

चाफळला रामपंचायतानाची प्रतिष्ठापना होणार होती त्या आसपास समर्थानी लिहिलेलं काव्य.रामाच आगमन समर्थांना किती मुग्ध करत होत,याचा प्रत्यय आपल्याला या ओवीत दिसतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तुझे मारुतीसारिखे दास देवा..|*
*मज मानवा किंकरा कोण कोण केवा..|*
*दिनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे.|*
*तेणे मानसी थोर आनंद माजे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. वायुसुत हनुमंतासारखा अग्रगण्य असा सेवकराज तुझ्या दास्यत्वाचे गुण गातो..तुझे समूळ दास्यत्व स्वीकारून मनोभावे तुझ्या चरणाशी लिन होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. हनुमंतासारखा तुझा दास असताना माझ्या सारख्या मानवाची,दासाची तुलना मी त्या भक्तश्रेष्ठाशी करून काही चुकीचे करत नाहीये ना..?

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया.. हे धाडस मी करतोय कारण तू जसा अशा भक्तश्रेष्ठाचा आश्रयदाता आहेस तसाच माझ्या सारख्या शूद्र उपासकाचा ही तू प्रेमळ दृष्टीने उद्धार करतोस अशी तुझी कीर्ती आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..अशा भक्तीमुळ खात्रीने,केवळ तू माझा पाठीराखा आहेस,माझ्या साठी कनवाळू आहेस या कृतार्थ जाणिवेने माझं मन आनंदाने,साफल्याने भरून आलं आहे.

समर्थ हनुमंताच्या भक्तीचा  आणि श्रीरामांच्या सख्यत्वाचा दाखला देऊन स्वतःला त्याठिकाणी पाहतात.आणि रामाच  सर्वकारुण्य ब्रिद ओळखून स्वतः ही मनाशी संतुष्ट होतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुनायका नीकट दास तुझा..|*
*तुला विकिलासे स्वयें देह माझा..|*
*सदा सर्वभावें करी दास्य तुझे..|*
*देई आपुले वेसवेतेन माझे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी तुझा अतिशय शीघ्र आणि जवळचा दास आहे.मला तुझी हरप्रकारे सेवा करायची असल्यामुळे तुझ्या प्रत्येक,नवविधाभक्तीमध्ये मला स्वतः सादर व्हायचं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..हा माझा देह तुझ्या भक्तीच्या,आशिर्वादाच्या बदल्यात पूर्णपणे तुझा झालाय.मी त्याचे कोणतेही ऐहिक मूल्य आता ठेवलेले नाही.राखलेले नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..मी हरप्रकारे तुझी सेवा,उपासना करतोय. तू दाखवलेल्या मार्गावरून चालतोय.तुझा आदर्श घेऊन माझं आयुष्य व्यतीत करतोय.तन,मन,धनाने केवळ तुझं दास्यत्व मी स्वीकारलेलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया..आता मला माझ्या या दास्यत्वाचा मोबदला दे.आणि तो मोबदला म्हणजे तुझ्याशी अक्षय एकरूपता..!तुझ्या अखंड उपासनेचे कर्तृत्व..!तुझे आजीवन दास्यत्व..!

समर्थ उपासनेच अंतिम फलित कायमच रामचरण अपेक्षित करतात.आणि त्यासाठी रामाकडे स्वतः  स्वीकारलेल्या सर्वस्व त्याग आणि सदेह दास्यत्वाची आठवण ही करून देतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२