समर्थांची करुणाष्टके (३), कडवे चौथे..

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे चौथे..

समर्थ म्हणतात...

किती भार घालू रघुनायकाला...
मज कारणे सीण होईल त्याला...
दीनानाथ हा संकटी धाव घाली...
तयाचेनि हे सर्व काया निवाली...!

रामराया...मला नेहमी अस वाटत की माझं सुख,माझी सुबत्ता,माझं वैभव हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे..तुझ्यावर भार आहे..!तूच त्यासाठी काळजी घेतोस..आणि तूच मला हे सारं पुरवतोस..! तुझ्यावर भार घालायच्या माझ्या प्रवृत्तीची माझी मलाच लाज वाटू लागली आहे..!

रामराया..मला माहिती आहे  कायम माझ्या सभोवती,माझ क्षेमकुशल,मंगल घडवण्यासाठी तू अपरंपार कष्ट घेतो आहेस..!मला खजील व्हायला होत की तू देवाधीदेव असून माझ्यासाठी इतका दमून जातोस...!!

रामराया,एवढंच नाही तर माझ्या सुखाच्या काळात ते देण्यासाठी तू माझ्याबरोबर असतोसच पण माझ्या दुःखाच्या,परीक्षेच्या काळात तू माझ्यासाठी धावून येतोस..!ते दुःख निवारण करून सुखाची बेगमी करतोस..!

रामराया..अस सगळं तुझं अस्तित्व सर्वकाळी माझ्याभोवती,माझ्या क्षुब्ध मनात एक शीतल छाया निर्माण करून जात..!आणि त्या तुझ्या कृपेच्या सावलीखाली माझं तनमन शांत निवांत होत जात...!!


समर्थ आपल्या भोवती रामराया ने ठेवलेल्या सुखप्राप्तीच्या मार्गाची जाणीव ठेवतात.तसच ते सुख निर्माण करण्यासाठी तो रामराया सदा सन्निध राहून एकप्रकारे कष्ट घेतोय अशी कबुली ही देतात..!

आपण ही आपल्या सुखाच्या वाटेवर घेऊन जाताना रामरायच त्या पायवाटेवर अनुभवतो ना?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे तिसरे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात..

रघुनायका दिन हाती धरावे...
अहंभाव छेदूनिया उद्धरावे..
अगुणी तयालागी गुणी करावे..
समर्थे भवसागरी उतरावे..!

रामराया..तुझ्यासारख्या सुखदाता,आनंददाता,कृपावंत,विर्यवान अशा दैवताने माझ्यासारख्या मुढ साधकाला हाती घेतल तर मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यातसाठी ची वाट सुकर होऊन जाईल..!

रामराया...माझ्यातले अहंकाराचे बीज,देहभावाची ओढ,सुखाच व्यसन हे सगळे अवगुण मुळापासून छेदून टाकलेस तर मी तुझा भक्त होण्यासाठी थोडा लायक होईन..!

रामराया...माझ्यातले गुण जे तुझ्या भक्तीसाठी आवश्यक आहेत ते माझ्या अहंकार,देहबुद्धी आणि स्वार्थ याने विस्मृतीत गेले आहेत,त्यावर या सगळ्या अवगुणांचं मळभ दाटल आहे..ते बाजूला करून माझे गुण तू दाखवून देशील..जेणेकरून मी तुझ्या भक्तीत परिपूर्ण होऊ शकेन !

रामराया.. हे सगळं झालं तर मग मी या जगाच्या रोजच्या कार्यात,संसारात,प्रपंचात असून सुद्धा तुझ्या भक्तीपासून वंचित न होता सुखनैव आयुष्य कारणी लावू शकेन..!


समर्थ स्वतःच्या देह आणि मन यावर वेगवेगळे यथोचित संस्कार करून  ईश्वरभक्तीच्या मार्गावर मला घेऊन जा अशी रामाजवळ विनवणी करतायत..!
आपण ही अशी विनंती करायला हवी होय ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (३), कडवे दुसरे...

समर्थांची करुणाष्टके (३)

कडवे दुसरे...

समर्थ म्हणतात...

रघुनायक जन्मजन्मांतरीचा..
अहंभाव छेदूनि टाकी दिनाचा...
जनी बोलती दास या राघवाचा...
परी अंतरी लेश नाही तयाचा...!

रामराया...मी किंव्हा आम्ही सगळेच जन्माला येतो तेंव्हा सोहम वृत्ती सोडून कोहम वृत्ती धारण करतो..!कोहम म्हणजे मी आणि माझा मी..!मनुष्यजन्माला आलो तेंव्हाच हा मनुष्यपणाचा अहंकार माझ्या मनाला चिकटला..!

रामराया..हा अहंभाव,ही मनुष्यपणाची बेदरकार वृत्ती हीच माझ्या भक्तीच्या मुळाशी आलेली आहे..!रामा तूच आता माझ्या मनातल्या अहंभाव समूळ नष्ट करून आत्मारामापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवशील का रे..?

रामा..मी जगताना तुझे नाम घेतो,तुझ्या ध्यानात असतो,तुझ्या सेवेत असतो..हे सगळं बघून माझ्या भोवतीचे माझे सगेसोयरे मला तुझा म्हणायला लागले आहेत..!मी तुझ्यात रमलोय अस म्हणायला लागले आहेत..माझी ओळख तुझे समचरण असे समजायला लागले आहेत..!

रामराया..हे सगळं असलं तरी तुझे मूळ स्वरूप आहे..सगुणाच्या पलीकडचं  जे निर्गुण निराकार रूप आहे त्याच अस्तित्व अजूनही मला कळत नाहीये..!

रामकृपा ही रामदासाच्या बाह्य वागणुकीवर नाही तर भक्ताच्या आत राम किती पोहोचलाय..त्याच्यातला आत्माराम किती प्रकट झालाय..?यावर अवलंबून असते.आणि ती अवस्था येण्यासाठीची समर्थांची तळमळ आपल्याला इथे दिसून येते..!
हा आत्मस्वरूप राम आपल्या सर्वांच्या ठायी प्रकट होवो ही समर्थचरणी प्रार्थना..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (3), कडवे पहिले...

समर्थांची करुणाष्टके (3)

कडवे पहिले...

समर्थ म्हणतात...

नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही..
नसे प्रेम हे रामविश्राम नाही..
असा दिन अज्ञान दास मी तुझा..
समर्था जनी घेतला भार माझा...!

रामराया...माझ्या अज्ञानतेने मला तुझ्या भक्तीचे मार्ग माहित असले तरी सुद्धा त्याच आचरण कस करायचं हे कमीच कळत.तुझ ध्यान,तुझं मनन करायचं असत,भक्त करतात हे मला ही माहिती आहे पण त्याच अनुकरण कस करायचं हे कळत नाही..!

रामराया..तुझ्याबद्दल ची माझी भक्ती,तुझ्याबद्दलची माझी ओढ मी तुला कळेल अशा प्रकारे मांडू शकत नाहीये.तुझ्या धामी पोहचल्यानंतर तिथे मला जे सुख मिळेल त्याची गरज मी तुझ्याजवळ व्यक्त करू शकत नाही..!

रामराया...इतका हतबल मनाचा अतिशय विकल अवस्थेत मी माझ्या अज्ञानाने पिडलेलं असलो तरी मी तुझा दास आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे..!

रामराया...इतक्या सगळ्या अवगुणातून माझं आयुष्य चाललेल आहे..मी जगतो आहे याला कारण म्हणजे माझ्या भोवतीच्या तुझ्या खऱ्या भक्तांनी,समाजाने माझा भार घेतलाय..!त्या पुण्याईने मी या भवसागरातून सहजपणे तरून जातोय..!

समर्थ आपल्या उपासनेच श्रेय ही स्वतः घ्यायला तयार नाहीत.करवून घेणारा राम, करणारा आत्माराम, सांभाळ करणारा समाजराम(समाजपुरुष).

मिळवलेल्या पुण्याईच एवढं अर्ग्य आपण इतक्या सहजतेने सोडू शकू का..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२), कडवे आठवे...

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे आठवे...

सदा सर्वदा राम सांडून कामी...
समर्था तुझे दास आम्ही निकामी..
बहु स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो...!

रामराया...तुझ्या भक्तीने,तुझ्या उपासनेत असावं हे खरं प्रत्येक मानवाच ब्रीद..!हेच खरं त्याच कर्तव्य..!पण काम नावाचा एक दैत्य ही उपासनेत कायम बाधा आणायच प्रयत्न करतोय..!
प्रत्येकवेळी माझं ध्यान,माझं पूजन हे काम नामक दोरखंड मागे ओढू पाहतोय..!

रामराया..तुझे दास म्हणून आम्ही आम्हाला मिरवतो..!भक्त म्हणून स्वतःला बिरुद लावतो..!पण मला आतून कळतय,समजतंय की या  सगळ्याला मी लायक नाहीये..!त्यादृष्टीने माझे अस्तित्व निरूपयोगी ठरत चालले आहे..!

रामराया..माझ्याभोवती चाललेले मला भुलवू पाहणारे हे सगळे भौतिक स्वार्थचे खेळ मला माझं मन दोलायमान करून,त्यासाठी माझी शाररिक,मानसिक दमछाक करून मला म्हणजे माझ्या आतल्या भक्तीतत्वाला तुझ्यापासून दूर ठेवून वैषम्य देऊ पहात आहेत..!

रामराया...त्यामुळे या सगळ्या ओढताणीची परिणीती माझा हा झालेला जन्म केवळ व्यर्थ जाणार असे वाटू लागले आहे..!

रामराया..माझी ही व्यर्थता शाब्दिक उपासनेतून  तुझ्याकडे व्यक्त करतोय..!तूच आता माझ्या या व्यर्थतेतून मला सोडवून माझ्या आयुष्याची यथार्थता माझ्यावर कृपा करून माझं आयुष्य कृतार्थ करून देशील याची खात्री आहे..देशील ना..?

श्रीराम...!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२) , कडवे सातवे...

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे सातवे...

समर्थ म्हणतात...

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती..
किती धर्मसंस्थापना अन्नशांती..
परस्तावलो कावलो तप्त झालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया..तुझ्या भक्तीत तल्लीन झालेले..योगसमर्थ्याने स्वतःच्या शरीर आणि मानसिक आवश्यकतांना नियंत्रित केलेले असे कितीतरी योगी,हठयोगी,पुण्यमूर्ती,कैवल्यमूर्ती तुझ्या दर्शनासाठी तुझ्या कृपेसाठी तिष्ठत तुझी आराधना करतायत..!

रामराया..तुझ्यासाठी पुण्यकार्य करताना अनेकांनी अनेकमार्ग स्वीकारलेत..काहीजण अन्नछत्रे चालवतायत..कितीजण भजन,प्रवचन,कीर्तन यामार्गाने धर्मसंस्थापना करून पुण्यसंचय करतायत..!

रामराया...या सगळ्यांचे दर्शन घेतो.त्यांच्याबद्दल माहिती होते...तेंव्हा मला माझ्याबद्दल पश्चाताप होतोय..!मला माझाच प्रचंड राग येऊ लागलाय..मी का तस होऊ शकत नाही.?या जाणिवेने मी दग्ध होतोय..आणि ती धग माझ्या आयुष्याला दग्ध करू पहातेय..!

रामराया..म्हणून मला अस वाटू लागलंय की ह्या दग्ध देहाला तुझी कृपा मिळू शकत नाही..तर माझा हा जन्म व्यर्थ जाऊ लागला आहे..!

समर्थ परमेश्वर प्राप्तीचे मार्ग सांगून स्वतःला ते अवलंब करता येत नाहीयेत याची खंत व्यक्त करतायत..!
इतका हा उत्तुंग धर्मकार्य,समाजकार्य करणारा महासंत रामाजवळ ही खंत व्यक्त करतोय,म्हणजे रामकृपे साठी किती विनय अजून आपल्यात यावा लागेल याचा आपण सारे विचार करू शकतो..!!

श्रीराम..!


©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक (२), कडवे सहावे..

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे सहावे..

समर्थ म्हणतात...

कितेकी देह त्यागिले तूजलागी..
पुढे जाहले संगतिचे विभागी..
देहेदुःख होताच वेगे पळालो..
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो...!

रामराया...
तुझ्या साठी तपसाधना करता करता कित्येकांनी स्वतःचे देह झिजवलेत..घोर तपस्या करता करता अनेकांनी मृत्यपर्यंत तुझी अपरंपार प्रार्थना केली आहे..अनेक कठीण अनुष्ठाने,उपवास करून स्वतःच्या देहभावना विसरण्याची पराकाष्ठा करत  ते तुझ्या धामी पोहचले आहेत..!

रामराया, हे सगळं करूनच  अनेक जण तुझ्या सस्वरूपाचे सांगाती झालेले आहे..रामरंगी रंगून जीवन सार्थकी लावून गेले आहेत..!

रामराया,या सगळ्याचा मी ही प्रयत्न करतोय..पण मनाचे विकार,देहबुद्धी लगेच डोकं वर काढतीये..!भूक,तहान, वेदना,सहनशक्ती ह्या साऱ्या गोष्टी मला माझी साधना गिळंकृत करायला येतात..!
माझी साधना ही दुय्यम ठरुन माझी देहबुद्धीच माझं शरीर अनुसरू लागत..!आणि मग ती देहबुद्धी मला तुझ्या साधनेपासून,भक्तीपासून दूर घेऊन जाऊ लागते..!

रामराया...याच देहबुद्धीचं ओझं माझ्या आयुष्यावर,जिवीत्वावर पडू लागलय...तुझी भक्ती,तुझी ओढ ही मागे पडत चाललीये..आणी या देहबुद्धी सहित माझं अस्तित्व उगीच जन्माला आल,अकारण जन्माला आल अस वाटू लागलं आहे..!

रामराया..या देहबुद्धीचं विस्मरण होऊन तुझ्या चिरंतन अस्तित्वाच चिरकालीन सुख माझ्या ठायी येऊ दे..!

श्रीराम..!!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक (२) कडवे पाचवे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे पाचवे...

समर्थ म्हणतात..

बहुसाल देवाळये हाटकाची..
रसाळा कळा लाघवें नाटकाची..
पूजा देखतां जाड जीवी गळालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया..तुझं मंदिर म्हणजे एक मुक्तीस्थळ असत.कितीही वेळा तिथे आलं तरी मन भरत नाही..तुझी षोडशोपचार पूजा ,तुझी अंगपूजा रोज  अव्याहत पहातोय..!ही पूजा एक चित्रकथी,एक सुंदर नाटक पहातोय इतका मी त्यात नेहमी गुंग होऊन जातो..!

रघुवीरा..तुझा तो रसाळ दृष्टीक्षेप,सुमधुर हास्य,लक्ष्मण सीतामाई  बरोबरची आश्वासक आमच्या आयुष्यातली साथ..हे सारं केवळ मुग्ध करणार आहे..!

रामा.. पण हे सगळं बघताना मला माझ्या असमर्थतेची ही आठवण होते..!प्रत्यक्ष तर नाहीच..मानसपूजेत ही तुझ्यासाठीचे हे सोळा संस्कार,उपचार मी एकाग्रतेने करू शकत नाही..!तेवढी तुझ्याशी माझ्या मनाची तन्मयता अजून ही जुळत नाहीये..!

रामा..किती रे प्रयत्न करू अजून मी..?मला अजूनही तुझ्या उपासनेत सर्वस्व ओतता येत नाहीये..आणि त्यामुळे माझ्या भक्तीहीन देहाचा भार अकारण भूमीवर पडून माझं आयुष्य व्यर्थ चाललय..!जन्म व्यर्थ होत चाललाय..!

वयाच्या बाराव्या वर्षी रामकृपा होऊन ही समर्थ इतक्या लिनतेने रामरायाला विनवत आहेत..!

ही आर्त विनयशीलता आपण ही अंगात बाणवूया  हो ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक .२ कडवे चौथे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे चौथे...

समर्थ म्हणतात..

तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले..
असंभाव्य ते कीर्ती बोलोनि गेले..
बहु धारणा थोर थकीत झालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो..!

रामराया...तुझ्या साठी आयुष्य टाकणारे,जीव प्राण  याची पर्वा न करणारे,तुझ्या केवळ एका कृपाकटाक्षासाठी पूर्ण तहानभूक विसरणारे,देहात असून ही विदेही व्रत घेतलेले असे सगळे तुझे भक्त असंख्यात होऊन  गेलेत..काही अजूनही माझ्या भोवती आहेतच..!

रामा..या सगळ्या भक्तांनी तुझ्याप्रति असलेल्या भक्तीचे अतिशय उंच आयाम त्यांनी निर्माण करत एकाहून एक कीर्तीयुक्त आदर्श निर्माण केले आहेत..!
हे आदर्श माझ्या सारख्या हीन भक्ताला केवळ अशक्यप्राय वाटतात..पण तरीही त्यांचं भक्तीयुक्त आचरण मला नेहमीच प्रेरणादायी ठरत..!

रामा ..त्या सगळ्या भक्तश्रेष्ठींची धारणा बघून माझं मन पुन्हा पुन्हा विस्मित होते आहे.मला माहिती आहे की रामराया..ही धारणा म्हणजे आतुरता,श्रद्धा आणि इच्छा यांचं सुंदर मिलाफ रूप आहे..!पण त्या धारणेचे सुंदर प्रकट असे हे भक्तराज पाहून मला त्यांच्या उंचीबद्दल खरोखर कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतेय..!

रामराया...पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळं पाहून,अनुभवून माझ्या स्वतःच्या मानसिक आणि पारमार्थिक खुजेपणाची जाणीव होऊन मी भूमीला भार आहे अस वाटू लागले आहे..!

समर्थ त्यांच्या साधनकाळातली ही अनन्य शरणभक्ती विनयशील पद्धतीने आपल्यासाठी खुली करतायत..!

आपण आपल्या जन्माची व्यर्थता टाळायची असेल तर करुणाष्टकांची यथार्थता समजून घेतली पाहिजे ..हो ना?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच करुणाष्टक (२), कडवे तिसरे...

समर्थांच करुणाष्टक (२)

कडवे तिसरे...

समर्थ म्हणतात...

सदा प्रेमरासी तया भेटलासी..
तुझ्या दर्शने स्पर्शने  सौख्यरासी..
अहंता मनी शब्दज्ञाने बुडालो..
तुझा दास मी वेर्थ जन्मासी आलो...!

रामा.. तुझी कृपादृष्टी ही किती भावुक आहे रे..जे जे भक्त मनातून तुझी सात्विक  आराधना करून तुझ्याशी एकरूप झाले अशा सगळ्यांना तू प्रेमभरे तुझ्या  सस्वरूपाची ओळख करून दिलीस.!त्यांच्या हृदयातल्या आत्मारामा पर्यंत पोहचण्यासाठी तू त्यांची साथ दिलीस..ते आत्मसुख,तो निजानंदी बहर तुझ्या भेटण्याने त्यांना मिळून गेला..!

रामा..तुझ्या नुसत्या दर्शनाने,तुझ्या कृपा स्पर्शाने सगळी भौतिक सुखे निष्प्रभ ठरून कायमची,आत्मसुखाची,परमेश्वर मिलनाची गाढ सुखराशी त्यांच्या पदरात तू रीती केलीस..!

रामा..मी मात्र माझ्या अल्पज्ञानाने काही थोडे फार ग्रंथ वाचून मी तुझ्या अनुभूतीला लायक झालो आहे असा अभिमानयुक्त गैरसमज करून घेऊन त्याच अज्ञानाच्या दिखाऊ अंधारात चाचपडू लागलोय..!
तुझं असणं हे शब्दाच्या पलीकडे,तुझं वर्णन शब्दातीत आहे हे विसरून फक्त शब्द माहीत झाले म्हणून तू मला समजलास इतक्या बेपर्वा बुद्धीने मी तुझ्या पासून दुरावत गेलो..!

रामा या सगळ्यामुळे,माझ्या या अभिमानाच्या ओझ्याने माझं या भूमीवर रहाणं  ओझं,भार आहे अस जाणवू  लागलं आहे..!

रघुवीरा..त्या सगळ्या संत,महंत,सज्जन व्यक्तींशी मला माझी तुलना करायची नाहीये.पण निदान त्यांच्या पर्यंत, त्यांच्या उंच भक्तीची पातळी गाठेपर्यंत तू मला लेकरू समजून समजावून घेशील ना??

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे करुणाष्टक (२), कडवे दुसरे....

समर्थांचे करुणाष्टक (२)

कडवे दुसरे....

बहु दास रे तापसी तीर्थवासी..
गिरीकंदरी भेटी नाही जनासी..
स्थिती ऐकता थोर विस्मित झालो..
तुझा दास रे व्यर्थ जन्मासी आलो...!

रामा..तुला मिळवण्यासाठी प्रत्येक जण तप करतोय फक्त प्रत्येकाची तपपद्धती वेगवेगळी..शाररिक कष्टाने,मानसिक कष्टाने..काहीजण जमेल तस तप करतायत..!
सगळ्यांच इप्सित,साध्य रामा तूच आहेस..!
अशा सगळ्या मानवाकडे,त्यांच्या वैयक्तिक तपाकडे बघून मला कुतूहल,आश्चर्य वाटत..!

रामराया..काहींची तप तर यापेक्षा कठोर असतात..!स्वतःच्या देहाला अतीव कष्ट घेत,स्वतःच्या सहनशक्तीची परीक्षा घेत..मानसिक शक्तीची परिसीमा गाठत हे तपश्री एकांतात,विजनवासात,गुहेत,कुटी बांधून समाजापासून दूर फक्त रामा तुझी आराधना करतायत..!
किती प्रकारे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री मला हेच दिसतंय..!

रामा..हे सगळं बघून माझ्यामनात खंतवजा आश्चर्य वाढू लागल आहे..!ही माझी आश्चर्यचकित अवस्था ही माझी तुझ्या दर्शनाची भूक जास्त वाढवतीये..!

रामा..पण हे सगळं मला अजून जमत नाहीये..!हे शाब्दिक,मानसिक तप पुरे पडतंय अस मला वाटत नाही..!
आणि मग माझं शरीर,माझी काया या जगात येऊन वाया चालली आहे..याची जाणीव होतीये..तुझ्याशिवाय माझं आयुष्य व्यर्थ चाललय हे कळू लागलंय..!!

समर्थाचे शब्द आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात..!
आपल्याला जर हा जन्म व्यर्थ घालवायचा नसेल तर त्यांनी घालून दिलेली रामकृपेची पायवाट ही आपल्याला चाललीच पाहिजे..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

.... स्वामी.....

.... स्वामी.....

या शब्दानंतर कैवल्य,ज्ञान,आश्वासक कोमल नजर अस सगळं बुद्धी आणि नजरेसमोर येत..!

स्वामी म्हणजे ज्याच्यासाठी आपलं संपूर्ण सर्वस्व अर्पण करायची असते ती वंदनीय व्यक्ती..!

पण त्या स्वामींच्या दृष्टीने त्यांची स्वतःबद्दल ची व्याख्या म्हणजे एका त्या जगदिशापुढे जगातल्या बाकीच्या सर्वस्वाची पत्रास बाळगत नाहीत ते..!

अस स्वामीपण लेऊन आलेले परमपूज्य श्रीधरस्वामी यांची आज पुण्यतिथी..!

श्रीधरकुटी च्या केशरी उंबऱ्यावर माथा टेकून आत गेल्यावर माथ्यावरच्या लाकडी जुन्या तूळईकडे लक्ष जात..!
जाणवत कैवल्याची झुंबर ठायी ठायी जाणवतात..!

ठशीव बांधकाम आणि आतला मृदभाषी वावर..त्या बोलाचे प्रतिध्वनी अजून ही ऐकणाऱ्याला ऐकू येतात..!

बाहेरून आत गेल की निरव अशी शुद्ध सात्विक निरामय शांती जाणवते..!

काय असेल अस वेगळं तिथे??शांतिब्रह्म स्थिरावल असेल..?ओंकार शुद्धस्वरूपी राहिला असेल..?
स्वामींच्या वर्णनात्मक श्लोकात म्हणतात तशी ती निजतृप्ती इथे येऊन तृप्त झाली असेल??

इथे आलेल्या सगळ्यांनाच आयुष्यभर पुरणारा स्वानंद मिळून जातो..!

माझे वडील मला सांगतात की श्रीधरस्वामींचा हात त्यांच्या पाठीवरून कित्येक वेळा फिरला आहे..!
त्या स्वानंदाचा कैफ त्यावेळी त्यांच्या नजरेत दिसतो..!
तोच श्रीधरकुटीत आलो की अलुट लुटता येतो..!

इथल्या कणाकणाने स्वामींच अस्तित्व पाहिलंय..!त्यांची अनेक मंत्रमय,मौन अनुष्ठाने या वास्तूने पाहिली आहेत..!

शांत वास्तू.. दिव्य अनुभूती.
सत्य शिकवण..निजानंद निजरूप..!
स्वानंद ओळख..तृप्त मन..
श्रीधरस्वामी ते स्वरूप..!🙏

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांची करुणाष्टके (२), कडवे पहिले...

समर्थांची करुणाष्टके (२)

कडवे पहिले...

समर्थ म्हणतात...

असंख्यात रे भक्त होऊनी गेले...
तिहीं साधनांचे बहु कष्ट केले..
नव्हे कार्यकर्ता भूमीभार झालो..
तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो...!

रामराया...मारुतीरायापासून तुझ्या भक्तांची शृंखला ही अतुलनीय आहे..!तुझे असंख्य भक्त,तुझे असंख्य प्रशंसक,तुझ्या चरणी लिन झालेले लक्षावधी संत,साधू असे कितीतरी..!
हे सगळे कितीतरी संख्येने आहेत..!त्यांची तुझ्याप्रती  असलेली निष्ठा याला कोणतीही मर्यादा नाही..!

या सगळ्यांच्या,भक्तश्रेष्ठ महाजनांच्या रांगेत माझं स्थान खूपच मागे आहे..!

रामराया...या सगळ्या नरश्रेष्ठांनी तन, मन,धनाने तुझी अपार सेवा,भक्ती केलेली आहे..त्या भक्तीचे  अतिशय नेत्रदीपक मानदंड त्यांनी माझ्यासमोर घालून दिलेले आहेत..!
आपण आहोत त्या शाररिक,मानसिक,आर्थिक अवस्थेत तुझी भक्ती अबाध्य कशी ठेवायची ह्याचे ही आदर्श त्यांनी घालून दिले आहेत..!

पण रामराया..या सगळ्यांच्या तुलनेत माझी भक्ती,माझें आर्जव, माझे तुझ्याबद्दलचे ज्ञान खूपच तोकडे वाटायला लागले आहेत..!

रामा..अश्या साऱ्या तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठी चाललेली माझी धडपड ही केवळ धडपड रहातीये..!तुझ्यासाठी मला भक्त म्हणून,सेवेकरी म्हणून जे कार्य करायचे ते अपूर ठरतंय..!मी स्वतः माझं हे शरीराच ओझं या भूमीवर निर्हेतुक घेऊन फिरतोय अस मला वाटायला लागलं आहे..!माझा हा कर्तव्यहीन देह या भूमीभार आल्याची लाज मला वाटायला लागली आहे..!

रामा...हे सगळं असलं तरी तुझा दास मी आहे अस मी मानतोय..!तुझा दास असुन मनासारखी आणि तू प्रसन्न होण्याइतपत सेवा करता येत नाहीये म्हणून माझा जन्म मलाच लाजिरवाणा वाटतोय..!

समर्थ किती समर्थपणे आपली पार्श्वभूमी भक्त म्हणून व्यक्त करतायत..?
हे ही करणं आपल्याला जमत नाही..!
कारण राम आणि आपल्यामध्ये आपला देह  येतो..!
त्या देहाचं असणं हे त्या रामपर्यंत जायचं एक माध्यम आहे तेच या साधनेत शाप ठरत आहे..!
हा देह भक्तीविना,उपासनेविना भूमीभार ठरतोय अस प्रांजळ मत समर्थ इथे व्यक्त करतायत..!

अस प्रांजळ आपल्याला आपल्या मनाशी होता येईल..?
यायलाच पाहिजे..!

श्रीराम...

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२