Karunaashtake 11

 कडवे अकरावे..

समर्थ म्हणतात...

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे..
रघुपतीवीण आता चित्त कोठे न राहे..
जिवलग जीव घेती प्रेत सांडून जाती...
विषय सकळ नेती मागुता जन्म देती..!

एक विदारक सत्य..!
सगळ्या पाशात गुंतलेल्या एका जिवाच यथार्थ आणि अंतिम वर्णन..!

मी कमावलेल्या धनाचा,माणसांचा मला उपयोग आहे हा गैरसमज घेऊन मी माझं जीवन जगतोय..!माझ्या भोवतीच मला मिळणार ऐश्वर्य हेच माझं आयुष्यच इप्सित आहे अस मी समजतोय..!

पण रामराया या सगळ्यात, आहे त्यात सुख मानायचं असा कानमंत्र तूच आम्हाला संताकरवी दिलास ना..?

मग आता हे सुद्धा आम्हाला समजावत नाहीस की हे सुख तुमचं अंतिम ध्येय नाही..ही आसक्ती तुमचं कल्याण करणार नाही..!
हे चित्त,मन जे काही तुम्हाला दिलं ते तुला (रामाला) स्मरण करून मग हे सुख भोगण्यासाठी दिलेलं आहे..!

या शरीरातील जीव नावाच एक चैतन्य एकदा संपलं की हातावरचा ऐवज काढून घेऊन जवळच्या व्यक्ती त्याच प्रेत करून ते सोडून देणार आहेत..!
या शरीराने आत्तापर्यंत संभाळलेली नाती,ममत्व,कष्ट सगळं सोडून केवळ एक निष्प्राण देह म्हणून त्याचा त्याग करणार आहेत..!

आणि एवढं सगळं घेऊन सुद्धा त्या देहाला चिकटलेला दंभ,दर्प,आसक्ती जर तशाच राहिल्या तर जन्ममरणाचा फेरा पुन्हा आहेच..!पुन्हा तेच चक्र..!

रामा थांबव हे..!तू आसक्तीच ठेऊ नकोस या देहात..!या जन्मीच मला निरिच्छ करून टाक..!
पुन्हा तोच जन्म,तेच  जिवलग,तीच आसक्ती,तेच मरण..काही नको ..!

आता फक्त रामस्वरूप कायमच..!🙏

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak 10

कडवे दहावे...

समर्थ म्हणतात...

तुजविण मज तैसे जाहले देवराया...
विलग विषमकाळी तुटली सर्व माया..
सकळजन सखा तू स्वामी आणिक नाही..
वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही...!

जन्म घेतल्यानंतर मनुष्याच्या एका अवस्थेच वर्णन समर्थानी यात केलंय..!

गर्भात असताना सोहमचा जप करणारा जीव जन्मानंतर लगेच कोहम जपू लागतो..!जी जिवंत नाळ परमात्म्याशी जोडलेली असते ती शाररिक आणि मानसिक रित्या छेदली जाते..!
त्या परमात्म्याशी अंतर वाढत जाते..आणि भौतिक जगामधील अंतर कमी होऊ लागते..!परमात्म्याला उद्देशून केलेली कृती तुजसाठी ऐवजी तुजविण होऊ लागते..!
आणि एक क्षण असा येतो की त्याक्षणी तो ईश्वर किती आपल्यापासून दूर गेलाय याची जाणीव होते..!
या क्षणाच वर्णन समर्थ या कडव्यात करतात..!

ते म्हणतात तुझ्यापासून दूर असताना आणि मी काही त्रासात,दुःखात थोडक्यात  आयुष्यातल्या काही विषम अवस्थेत मायेची सगळी माणस, आधार वाटणारे हात सगळे साथ सोडतात..!
माया ही उंबऱ्यापर्यंतच थांबते..!

पण अशा क्षणी सगळ्या विश्वाचा तारक, मित्र,सखा म्हणून भक्तांनी बिरुद लावलेला तू माझ्या या सगळ्या अस्वस्थतेत एकमेव त्राता म्हणून उदयाला येऊ पहातोस..!

पण अशा वेळी पुन्हा विषयसुखाचे पाश,आशा,ममता,व्यवधाने सगळं मला मागे ओढू पाहतात..!

पण मी मात्र आता तुझ्या निस्सीम ,अलख स्वरूपाकडे आकृष्ट होत चालल्यामुळे ते सगळे पाश शिसारी येऊन माझ्या मनातून,शरीरातून बाहेर फेकत चाललोय...त्यांचा त्याग करत चाललोय..!

समर्थ त्यांनी रामकृपा मिळवण्यासाठी त्यांनी आचरलेली तत्वे,त्यांनी स्वतःवर घालून घेतलेले नियम स्वतः आपल्या आचरणासाठी खुले करतायत..!

आपण फक्त त्यांचा कित्ता गिरवायचाय..
मग त्यांना मिळालेली  रामस्वरूपाची पासूनभिक्षा आपल्याला ही प्राप्त होईल  ना?
नक्कीच होईल..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Ramnavmi

रामआगमन

आजच्या दिवशी पुन्हा राम जन्म घेणार..!त्याच क्षणी कित्येक वर्षांनंतर समर्थजन्म..!

प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर अशी की गुरूशिष्याची जोडी..!एकाच दिवशी,घटिकेवर या विभूतींनी जन्म घ्यावा इतकं सुनियोजित सुकर्म नियती कशी करू शकते?

एक पुरुषोत्तम राम आणि दुसरा जनकल्याणी धाम..!

एक कारुण्य,बुद्धी आणी पराक्रमाचा आदर्श..तर एक कर्तृत्व, सिद्धी आणि  निग्रही वृत्तीचा निष्कर्ष..!

समर्थानी रामाला आदर्श धरलं कारण शुचित देवत्व हे नेहमीच सुशांत असत..!
पूर्ण रामाच्या चरित्रात एखादा युद्ध प्रसंग सोडता राम चिडलेला कधीच सापडत नाही..!

राम हा उत्तम राजकारणी म्हणून ओळखला जात नसला तरीसुद्धा उत्तम राजा म्हणून ओळखला जातो..!हेच खरं रामाचं गूढ आहे..!

सीतेचे कोणतेही विशेष मनोरथ पूर्ण करण्याचे प्रसंग नसून सुद्धा राम एकपत्नी आणि प्रेमाचा आदर्श समजला जातो..!

कोणताही वेगळा प्रयत्न नाही..!केवळ चांगलं,विनम्र,शुद्ध वागून सुद्धा राम मनुष्याच आयुष्य देवगुणी जगले हे महत्वाच आहे..!

आणि समर्थ...

ते तर निग्रही तपस्वी,आग्रही शुद्ध मनस्वी आणि बलदंड  भक्तीपूर्ण ओजस्वी होते..आहेत..!

संसार न करता उत्तम संसारी.. युद्ध न करता उत्तम योद्धा..बिरुद न लावता उत्तम कवी..प्रत्यक्ष राजकारण न करता उत्तम राजकारणी..कोणताही व्यवसाय न करता उत्तम व्यवहारी...कोणतीही अतिरेकी भक्ती न करता यशस्वी पारमार्थिक..!

हे सगळं तेजस्वी रामपण आणि समर्थपण एकाचदिवशी पृथ्वीतला वर याव हे पूर्ण चराचारा साठी भाग्याच लक्षण..!

आता प्रार्थना एकच..

ह्या गुरुशिष्याच्या आदर्श जोडीने हा हिंदुस्थान,हे विश्व रामराज्य करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा..!

इतकीच सहेतुक प्रार्थना..🙏🙏🙏

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak - 9

समर्थांचे करुणाष्टक..

पायरी नववी...

कडवे नववे...

समर्थ म्हणतात....

जननी जनक माया लेकरू काय जाणे..
पय न लगत मुखी हाणता वत्स नेणे..
जळधरकण आशा लागली चातकासी..
हिमकर अवलोकी पक्षीया भूमीवासी...!

हे समर्थांच हुकुमी भाषासामर्थ्य..!उत्तम निरीक्षणशक्ती..आणि निश्चित अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणारी शब्दरचना..!

करुणाही बहुआयामी आहे त्यांची..!कोणतं उदाहरण कोणत्या प्रसंगासाठी द्यायचं हे त्यांच्या लेखनात प्रकर्षाने कळत..!
दृष्टांत दिला की विषय पटतात..!समर्थ भक्तीने ओतप्रोत होऊन स्वतःची भक्ती,तळमळ प्रत्यक्ष रामालाही समजवून सांगतायत..!

आईवडिलांच प्रेम हे अपत्यावर असणं सहाजिक आहे..!ते आहे हे दाखवण्यासाठी आईवडिलांना विशेष काही प्रयत्न करून दाखवावे लागत नाहीत..!वात्सल्य ही दाखवायची,प्रदर्शनाची गोष्ट नाही..!पण लेकरू मात्र आई,बाबा करत त्यांना जाणीव करून देत असत..!कारण लेकरू आजण असल्याने त्या वात्सल्यापासून अनभिज्ञ असत..!
समर्थ म्हणतात ..रामा तुझं माझ्याकडे लक्ष असणारच..कारण तूच माझा पालनकर्ता आहेस पण मी आपला अजाणपणे या करुणेद्वारे तुला सारखी हाक मारतोय..!
तुला माझी आठवण आहे की नाही याची सारखी खात्री करून घेतोय..!

वासरू गायीच्या अचळापाशी जात पण त्याच्या मुखात लगेच दूध येत नाही..!त्यासाठी गाय हलकेच पायाला थोडा हिसका देते.. गायीची कृती ही वासराला त्रास होण्यासाठी नसून त्याला दूध मिळण्यासाठी पान्हा फुटावा यासाठी असते..!
तसच तू माझ्या आयुष्यात मला दिलेले काही क्षण असतील की त्यात मला त्रास झाला असेल तर तो त्रास या प्रकारचाच आहे..!तू मला वाट पहायला लावणं हे तुझ्या लवकर दर्शनाच द्योतकच आहे..!पण मला मुढाला हे कळतय पण वळत नाही...!!

मी आपला आकाशातून पाण्याच्या कणांची केंव्हा बरसात होतीये याची वाट पहात बसलेल्या पक्षासारखा अधाशी तुझ्या स्वरूप दर्शनाची वाट पहात बसलोय..!
आणि तसच चातकाप्रमाणे ते तुझ्या कृपास्पर्शाचे चांदणकण मला कधी मिळतायत या आशेत जन्मोजन्मी वाट पहात बसलोय..!

सुंदर प्रतिभा..!समर्थ सउदाहरण रामाला,आणि त्याबरोबरच ही तळमळ कशी असावी ह्यासाठी हे सगळे दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगतायत..!

आपण सुद्धा आपली रामरायाला भेटण्याची ही  तळमळ अशाच प्रमाणे रामाला कळवायला नको का???

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak - 8

समर्थांचे करुणाष्टक...

पायरी आठवी..

कडवे आठवे...

समर्थ म्हणतात...

सबळ जनक माझा राम राम लावण्यकोटी..
म्हणवून मज पोटी लागली आस मोठी..
दिवसगणित बोटी ठेवून  प्राण कंठी..
अवचट मज भेटी होत घालीन मीठी..!


समर्थांना जशी रामाची कारुण्यरूपाची प्रचिती आहे तशीच त्याच्या बळवंत अशा रूपाची ही माहिती त्यांना आहे..!

विराटसमाज पुरुषाच अस्तित्व असलेला,या समृद्ध भक्तांचा जनक असलेल्या या श्रीरामाच्या अनेक लाघवी प्रतिमांचा उल्लेख समर्थ आपल्या या आर्जवी प्रार्थनेत करतात..!

रेखीव पुरुषी लावण्याची व्याख्या ही समर्थ अजब पद्धतीने करतात..!

पुरुषी लावण्य तत्वनिष्ठ,सुचरित,सुसौष्ठवी असत..!काळजीवजा कर्तृत्व,कर्तव्यनिष्ठ प्रेम,वस्तुस्थितीमय वात्सल्य ही सगळी रूप पुरुषी लावण्याचीच आहेत.

दिवस दिवस वाचिक,मानसिक,शारीरिक तप करून घेणारा राम हा प्राणांतिक वाट पहायला लावतो खरा..पण जेव्हा तो रामस्वरूप करून घेतो तेंव्हा या सगळ्या भौतिक  जाणिव,अपेक्षांच्या पलीकडे त्याने खुबीने आपल्याला पोहचवलेलं असत..!
हीच खरी रामाची खुबी..!

आयुष्याच्या या पारमार्थिक वाटचालीत हे रामराय आपल्याला अशा मुग्ध वाटेवर घेऊन जातात..की जिथे एका वळणावर ते आपल्यासाठी हात पसरून उभे असतात..!
आणि अशावेळी आपल्याला समजते की ज्याच्या समचरणाच्या मिठीला आपण बिलगु पहातोय तो राम आपल्याला आपल्यातच राहून बोलावतोय..कृपा करतोय..!

ही अवचट,अचानक भेट आपल्याला जीवनाची सार्थक करून देते..!

ही सार्थकता समर्थ पुन्हा पुन्हा रामाकडे मागतयात..!

आपणपण ती मागायलाच पाहिजे हो ना..?

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtak - 7

समर्थांच करुणाष्टक..
सातवी पायरी..
सातव कडवं...!

समर्थ म्हणतात...

 तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी...
शिणत शिणत पोटी लागली आस तुझी...
झडकरी झड घाली धाव पंचानना रे..
तुजवीण मज नेते जंबुकीं वासना रे...

रामा,माझे बाह्य त्रास,माझी बाह्य सुख दुःख मला सांगता येतील रे...!
आणि माझ्या भोवतीचे माझे या जन्मीचे सगे सोयरे ते ऐकतील ही..!
पण त्याचा कायमचा इलाज ते करू शकणार नाहीत याची मला जाणीव आहे..!आणि तुझी मला आस असल्याने मला तशी अपेक्षाही नाही..!

पण खरं सांगू ?

बाह्य जगात कुणाला सांगू न  शकणारी,माझ्या मनात जन्मोजन्म साठत जाणारी अंतःव्यथा ही तुझ्या दिव्यदृष्टीलाच कळेल..!

रामा...ह्या तुझ्यापर्यंत न पोहचायच्या हतबल विचाराने मी पुरता गलितगात्र झालेलो आहेच पण तरीही तुझ्या कृपेची मला लागलेली आस शरीर थकत चालल तरी वाढत चाललेली आहे..!

रामा ..मला माहितीये पंचेंद्रियांना नियंत्रित करणार   आणि त्यातील विकारांच संहार करणार पंचानन हे रूप तुझंच आहे..!तूच ते करू शकतोस..!तुझ्या येण्याने माझ्या विकार वासनांचा नाश होईल..आणि ती पंचेंद्रिये तुझ्या स्वरूपात येण्यासाठी शुद्ध होतील..!

पण रामा इतकी विनवणी करून सुद्धा तू येत नाहीयेस..माझी भक्तीची कमतरता मला जाणवतीये..!तस जर नसत तर माझ्या विकार,वासनांचा हा उच्छाद जंबुकासारख्या मुख असलेल्या या जन्ममरणाच्या मुखात परत परत ओढला गेला नसता..!

या सगळ्याला रामा तू आणि तूच नियंत्रित करू शकतोस.तूच या सगळ्यातून सोडवून मला  तुझ्या सतस्वरूपात घेऊन जायचा मार्ग सुचवू शकतोस..!

रामराया खरंच अस करशील ना??

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtake - 6

समर्थाच करुणाष्टक...
सहावी पायरी...
सहाव कडवं....!

समर्थ म्हणतात....

जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी..
मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी..
तळमळ नीववी रे राम कारुण्यसिंधू..
षड्रिपुकुळ माझे तोड याचा समंधु..!

समर्थ कालातीत विचार करणारे संत..!
आपल्या तत्वज्ञानात सांगितलंय जन्म एक दुःखाच मूळ..!दुःखाच कारण..!

अनेक जन्माच दुःख साचलेलं असल्यामुळे या मनुष्यजन्माला आलो..!कोट्यावधी जन्म झाले..!
कोट्यवधी मरणे झाली..!
वेगवेगळ्या योनीतले तेवढेच सुख दुःखाचे अनुभव झाले..!प्रत्येक जन्मात त्या गजेन्द्रासारखा धावा करतोय की रामा मला या फेऱ्यातून सोडव..!

पण कदाचित माझं पुण्य कमी पडतंय..!
तुझ्या कृपेची,करुणेची दृष्टी माझ्याकडे वळत नाहीये..!
समर्थ म्हणतायत की मला माहितीये की तू एकदा ठरवलंस तर तुझ्या  कृपेचा एक कटाक्ष माझ्यासाठी,माझ्यातल्या आत्मारामासाठी आत्मसुखाचा पूर होऊन येईल..!

कारण तो नीलकंठ ही  तुझ्या नामाने शांत होतो..तर तो करुणेचा सागर होऊन तू माझ्यातला हा सुप्त वडवानल शांत करू शकणार नाहीस का?

माझे अस्तित्व माझ्या भोवतीच्या मायावी षड्रिपु चिखलात रुतले आहे..!तू जर तुझा करुणामयी हात दिलास तर माझे हे आयुष्य,हा जन्ममरणाचा फेरा माझ्यासाठी मोक्षदायी होईल..!
आणि ज्या या षड्रिपु कुळापायी हे जन्म मरणाच चक्र चालू आहे त्याच कारण,संबंधच तुटून जाईल..!

समर्थ रामाला हरप्रकारे विनवतायत..!जितक रामचरणापाशी शरण जाता येईल तितक जातायत..!

त्यांचा निग्रही रामदर्शनाचा हट्ट हा या करूणभावनेत मिसळून एक आदर्श रामदासी वृत्ती तयार होतीये..!

जी आपल्याला ही बाणवता आली पाहिजे..!

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtake 5

समर्थांच करुणाष्टक...
पाचवी पायरी..
पाचव कडवं...!

समर्थ म्हणतात...

चपळपण मनाचे मोडिता मोडवेना..
सकळ स्वजनमाया तोडीता तोडवेना....
घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा..
म्हणवून करुणा हे बोलतो दिन वाचा.......!

मन आणि त्याचा प्रवृत्तीचा निश्चित नेमका आचारबंध समर्थानी या कडव्यात मांडला आहे..!

मनाच्या अनेक गुणांपैकी चपळपण,अस्थैर्य,चंचलता  हा गुण(?) जास्त आपल्याला अनुभवायला येतो..!

राममूर्ती समोर बसल्यावर चित्तासमोर,डोळ्यासमोर रामप्रभा असते,नक्कीच असते..!पण त्यावेळी आपलं हे मन...नजर आणि दर्शन याच्या पोकळीतून दूर कुठे तरी फिरून येत..!

एकदा मन चालल की मागोमाग भक्ती,त्यामागे भावना,त्यामागे नजर अस सगळंच चंचल होत..!

हजारो विचार,हजारो स्वप्न,हजारो अपेक्षा या ध्यानसमयी आपल्या भोवती फेर धरू लागतात..!
स्वतःची,आयुष्याची,आपल्या प्रियजनाची काळजी,ओढ,आठवण ही रामराय आणि आपल्यात दुराव्याची भिंत उभी करते..!

समर्थ हे कितीही विदेही असले तरी मनाची ही अवस्था त्यांनी साधनाकाळात नक्की अनुभवली होती.आणि म्हणूनच ते बारकाव्यासह या करुणाष्टकात त्याची रामरायासमोर प्रांजळ कबुली ही देतात..!

शुकासारखं वैराग्य प्राप्त करताना,उत्तम राजकारण शिकवताना,परमार्थ साधताना अश्या अनेक कसोटीच्या वेळा त्यांनी रामसाधनेत कशा बदलल्या हे समर्थ सांगताना आपल्याला ही गहिवरून येत..!

एकीकडे ही सगळी भावनिक आंदोलन,दुसरीकडे रामरायाची अतीव ओढ..यासगळ्या मध्ये रामचरणी शरण जात समर्थ कमालीचे करुणकोमल होतात..!

आणि हे भक्तीत ओथंबलेले कारुण्य रामचरणी मुक्तपणे रित करून समर्थ श्रीरामाना सांगतात की मी अतिशय दिनपणे या भावनिक,प्रापंचिक आंदोलनापुढे  हतबल होऊन तुझ्याकडे राममयी  होण्याची आशा धरून आहे..!

समर्थाची ध्यानबैठक,निग्रही भक्ती,रामाप्रती कोमल भावना..या सगळ्याचा परिपाक अष्टकाच्या या कडव्यात आपल्याला पाहायला मिळतो..!

श्रीराम..

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtke 4

समर्थांच करुणाष्टक...
चौथी पायरी..
चौथ कडवं..

समर्थ म्हणतात...

तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे..
तुजविण मज वाटे सर्व संसार ओझे..
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी..
अचल भजनलीला लागली  अस तुझी..

अत्यंत वस्तुस्थितीपुर्ण पण भक्तीयुक्त मागणे..!या जगात जगण्यासाठी, करण्यासाठी जे जे शुद्ध पद्धतीने करावे लागते करताना,ज्याला प्रपंच म्हणतात,हे समर्थ कधीच नाकारत नाहीत.

प्रपंच,गृहस्थाश्रम या सगळ्यात आपलं शरीर,मन,धन याची आवश्यकता असते.यातल्या प्रत्येक गोष्टीला सांभाळावे लागते..!त्यांचे लाड करावे लागतात...त्यांची मर्जी सांभाळावी लागते..!

पण समर्थ हे सगळं करताना या तिन्ही गोष्टी राम च आहेत हे समजतात..!
या शरीरात आत्माराम वसतो..!तो जिवंतपणा ची जाणीव देतो..!या मनात रां या बिजाक्षराच्या रुपात जो राम वसतो तो चैतन्य देतो..!आणि कष्टाच्या रुपात जो लक्ष्मीरुपात जो राम असतो तो मिळण्याऱ्या मोबदल्यात,धनात असतो..!

सारी रामाचीच रूप..!

प्रत्येक गोष्टीत रामाचं अस्तित्व शोधण ही रामाची अनन्य भक्ती..!
प्रभू रामरायांनी दिलेल्या कंठींकेत,प्रत्येक मण्यात तो फोडून राम शोधणारा हनुमंत समर्थांचा आदर्श..!

ज्याच्यात राम नसेल ती वस्तू,जागा,मोह,आयुष्य समर्थाना विलक्षण परक होत..!
किंबहुना रामस्पर्श नसलेल अस्तित्व त्यांना पूर्ण त्यागमय होत..!

अशा गोष्टींच,वस्तूंच ओझं समर्थाना कधीच मान्य न्हवत..!

पण अनेकवेळा अस होत की व्यवहार म्हणून अशा गोष्टी माणूस मान्य करू लागतो..!
अशा गोष्टी ज्यात राम नाही,सत्व नाही अशा गोष्टी केवळ लोकानुनय म्हणून कराव्या लागतात अस आपण मानतो..!

समर्थाना याच धोक्याची पूर्ण जाणीव आहे..!अस रामविरहीत आयुष्य माझ्या अंगवळणी पडून देऊ नकोस ही समर्थांची रामकडे मागणी स्वगुणपरीक्षेचा एक नवीन आयाम आहे..!

त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अचल अस तुझं अस्तित्व शोधायची,तुझं गुणगान गाणार माझं मन अस्तित्वात आणणार अस मन रामा तूच मला देशील अशी खात्री आहे..अस समर्थ म्हणतात..!

अस एक अबाध्य वळण माझ्या बुद्धीला,दिनचर्येला मिळो..!

अस समर्थांच रामाजवळ कळकळीने मागण..!!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtke 3

समर्थांच पहिलं करुणाष्टक
आज तिसरी पायरी..
तिसर कडवं...

विषयजनित सुखे सौख्य होणार नाही..
तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही
रविकुळटिळका रे हीत माझे करावे
दुरीत दुरी हरावे सस्वरूपी भरावे..

समर्थ कायमच संन्यस्त जीवन जगले..!विषयसुखाच्या पल्याड असलेला हा अवलिया एकच आसक्ती बाळगून होता ती म्हणजे रामप्राप्ती..!

बर ही निरिच्छता त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी प्राप्त झाली होती आणि तरीही हा महापुरुष अजूनही म्हणतोय की विषयजनीत सुखे सुख नाही..!निरिच्छतेची अजून एक पायरी..!दर्शनाची अभिलाषा ही सुद्धा एक आशाच..!माझ्यावर कृपा कर हे म्हणणं ही एक स्वार्थ च..!
रामराया तुझं दर्शन गोड नक्कीच आहे..पण तुझ्यात सामावण्या इतकं ते मनोहर नक्कीच नाही..!रामकृपे पेक्षा राममय होणं हे छान..!
म्हणून समर्थ सांगतात की तुझ्यावीण सगळच बेचव आहे..!अगदी तुझी कृपा,तुझा वरदहस्त ही..!
त्यामुळे रामरायाला वाहिलेला हा समर्थ देह त्याचं अंतिम हीत कर अशी प्रार्थना करतोय..!
जो रामराय कृपाळू, कनवाळू,दयाळू आहेच..सौख्यदायी आहेच..
पण तरीही अपेक्षा अशी आहे की त्या रामरायाने ह्या सगळ्यापेक्षा स्वतःच्या सस्वरूप करून हा देह संपवावा..!!

समर्थ रामरूप असून सुद्धा रामस्वरूपा साठी किती आसुसले होते,किती आतुर होते..!

ही आतुरता पाहिजे..!

अंतिम हीत हे कळलं पाहिजे.सुख हे हीत नक्कीच नाही..!

भक्ती असणे आणि ती भक्ती अनुभूतीपर्यंत पोहचवणे याचे रोखठोक मार्ग समर्थानी त्यांच्या साहित्यात अनेक दाखवलेत..!
समर्थानी रामाप्रति असलेल्या अमाप भक्तीच वर्णन ही तितक्याच नेमकेपणे केलं आहे..!
सुख दुःखाच्या पलीकडे असणारी समचरणी अवस्था म्हणजे अंतिम सुख..!

शेवटच्या ओळीत समर्थ रामाचं वर्णन रविकुळटिळका अस करतात..!

रामाचं तेजस्वीपण जस सूर्यकुळाची ओळख आहे तशीच ओळख रामा तुझ्यावरच्या भक्तीने माझी होऊन माझ्यावर विरक्तीच,मुक्तीच तेज दे..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Karunaashtke 2

दुसऱ्या कडव्यात समर्थ म्हणतात...

भजनरहीत रामा सर्वहि जन्म गेला..
स्वजनजनधनाचा वेर्थ म्या स्वार्थ केला.
रघुपती मती माझी आपुलीशी करावी..
सकळ त्यजूनि भावे कास तुझी धरावी..!

काय मजा आहे बघा समर्था सारख अनन्य भक्त ज्यांना रामकृपा,हनुमंतकृपा,दत्तात्रय कृपा दर्शनासहित प्राप्त झालीये ते म्हणतायत की भजनरहित रामा सर्वही जन्म गेला..!
किती अद्भुत आणि विनयशील आहे हे त्यांचं मागण..?
कस असतना..?
आपल्याला संसार असतो,नाती असतात, काळज्या ही असतात..सुख असत,दुःख ही असत..!
असायलाच हव..आपण माणूस आहोत..!!
ह्या सगळ्यातून आपण आपल्याला जमेल,रुचेल,आवडेल तशी भक्ती ही करतो..आणि आपण स्वतःला भक्त म्हणवतो..!
पण समर्थ ज्यांच्या श्वासात राम होता त्यांनी स्वतःवर भजनरहित होण्याचा आरोप का बरं ठेवला असेल..?

आपण ना मनुष्याच्या कृतीत उणेपणा शोधतो..आणि समर्थासारखी द्रष्टी व्यक्ती स्वतःच्या वृत्तीतला नसलेला उणेपणा शोधून तो बोलून रामसमोर शरण जाते..!

हे असे आपण कितीवेळा करतो..?

समर्थ जसे अत्यंत विरक्त वल्ली होती तसेच ते लोकोत्तर संत ही आहेत..!त्यावेळची परिस्थिती ही खूपच विचित्र होती..!यवनांच्या अधिपत्याखाली हे राष्ट्र होते..यातून बाहेर पडण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते समर्थानी केलं..!अनेक माणस जागी केली,त्यांच्यातली स्वातंत्र्य उर्मी जी मरगळून पडली ती त्यांनी पुन्हा जाजवल्य केली..त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर अखंड तजविजा आणि राजकारण केले..!ही सगळे धकाधकीचे मामले तीक्ष्ण बुद्धीने करत असताना त्यांचा मूळ पिंड जो रामदासाचा होता,रामशरण्याचा होता तो काही निमिष दूर गेला असेल..!
समर्थ त्या काळाविषयी बोलतायत..!या सगळ्यातून रामा या जन्मात मला तुझ्यासाठी खूपच कमी वेळ मिळाला रे..!
आपल्या आणि परक्या माणसांची परीक्षा करत,त्यांची खरी ओळख समाजाला पटवत,अखंड पायपीट या उत्तुंग जीवनात अनेक आपल्यापरकीयांना जवळ ही करावं लागलं..अंतर ही द्यावं लागलं..!रामा तुझा विचार न करता त्यांचा विचार,त्यांच्या बद्दलचे आडाखे करण्यात मी माझा स्वार्थ साधत गेलो..!हे सगळं करता करता कित्येक वेळा मी तुझ्या आस्थेपासून,तुझ्या अस्तित्वापासून दूर गेलो,स्वार्थीपणे वागलो ना रामा मी..?बर त्यात मनुष्य असल्याने पोटाचा,भुकेचा स्वार्थ तरी मला कुठं चुकला?? त्यातही मी फक्त माझा विचार करत गेलो..
मला माहित होतं हे सगळं वेर्थ आहे..तुझ्या अस्तित्वाशिवाय काहीच महत्वाच नाही..!जरी मी केलं नाही तरी माझ्याकडून तू करवून आहेस..तरीही या स्वार्थी पणातून जन्म मी घालवला..!
रामा आता तरी माझी ही बुद्धी बदलून दे..मला आता तरी शिकव की हे सगळं करत असताना तुझ्या केशरी शेल्याच छत्र मी कस धरून ठेवायचं.?किंबहुना हे ही सांग की हे सगळं सोडून तुझं फक्त तुझंच चिंतन कस करता येईल..?

समर्थ हे समर्थ का आहेत हे अशावेळी  कळत..!
आपल्या आयुष्याचा हिशोब ते रामासमोर खुलेपणाने मांडून राहिलेली उणीव जोडण्याची रामसमोर विनंती करतात..!हे आपले समर्थ..!

श्रीराम

©प्रवीण कुलकर्णी

Chaitra Shuddha Pratipada (Gudi Padwa )

आजपासून नऊ दिवस रामरायाच नवरात्र पाळूया आपण...


समर्थाची रामाला उद्देशून लिहिलेली करुणाष्टके ..
रोज एका कडव्याच निरूपण...
थोडं लिहिणार आहे मी त्याबद्दल..तस प्रत्येक अष्टकाबद्दल,त्यातल्या प्रत्येक कडव्या बद्दल लिहायचं तर बुद्धी पुरणार नाही..
पण तरीही प्रयत्न करतोय...!

श्रीराम समर्थ

रामनवमी आणि त्या आधीचे आठ दिवस हे रामपर्व,रामनवरात्र म्हणून ओळखले जातात..!
रामकृपेचे दिवस..रामसहवासाचे दिवस..!

आजपासून नऊ दिवसांनी नवमीचा दिवशी राम जो मूर्तीत आहे तो मनात,आयुष्यात,घरात पुन्हा यायचा दिवस..!
सगुणातून सजीवतेत तो राघव येणार..!
समर्थानी केलेली करुणाष्टके ही राम अवताराच्या आधी आपली मानसिक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आपण अनुभवू शकतो..!

राम येणार ना..?

तो येणारच पण आपली तयारी काय..?
करुणाष्ट्कात समर्थ रामाला साद घालताना स्वतः अनुदिन,अनुतापे तापलोय अस सांगतात..!अनुतापाने दग्ध झालेलं मन रामाची पायवाट आहे ना..?
हे अष्टक असच..!

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया..
परमदिन दयाळा निरसी मोहमाया..
अचपळ मन माझे ना आवरे आवरीता..
तुजवीण सीण होतो धाव रे धाव आता.!


हे पाहिलं अष्टक आणि त्यातील पाहिलं कडवं...!
कित्येकवेळा कित्येक माझ्यापेक्षा श्रेष्ठ विभूती कडून हे तुम्ही ऐकलं असेल..नव्हे नव्हे स्वतः वाचलं आणि म्हंटल ही असेल..!
शुद्ध मराठीत असलेलं ही रचना वेगळी काय सांगणार अस जर आपण म्हणत असाल तर एकच उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला या अष्टकाचा गर्भितार्थ कळेल..!

..आपण अनेक वेळा घरातून,स्वैपाकघरातून अहो ऐकलत का? हे ऐकलं असेल..
या तीन शब्दाचे किती अर्थ असू शकतात..?
काहीजण सहजपणे आलो म्हणतील..काहीजण आता काय नवीन अस म्हणून काळजीत पडतील..काहीजण हीच नेहमीचंच आहे असं म्हणून दुर्लक्ष करतील.. अस खूप काही..!

एवढ्या एका वाक्यात इतके गर्भितार्थ आणि निर्णयात्मक विचार असू शकतात..तर समर्था सारख्या चतुरंग पुरुषाने लिहिलेलं..आळवलेल किती गूढ असेल..?

या अष्टकात समर्थ
आपल्याला शबरी व्हायला शिकवतात.!
हो आपण शबरी झालो तरच राम येतील ना..?
समर्थ म्हणतात...
राम येण्यासाठी आपलं मन अनुतापी होऊ दे...आणि ते ही अनुदिनी..!

अनुताप म्हणजे दुःख नाही बर का..?तर अनुताप म्हणजे स्वतःच्या मनात सगळं असूनही दाटलेली हुरहूर..अस्वस्थता.. रामप्राप्ती ची ओढ..आणि भौतिक जगाबद्दलची उदासीनता..!

अनुदिनी सुख असून ही जी अपूर्णता असते तिला रोज वाट मोकळी करून देता येत नाही..!
हा अनुताप भौतिक नात्यात कुणाला सांगता येत नाही..या अनुतापाचा शेवट ही रामाची प्राप्ती किंव्हा प्रसन्न होणं..!

आपण देवळात येतो..कदाचित रोज येतो..पण मनाशी प्रामाणिक पणे आपण विचार करूया हे मंदिरात आपलं येणं हे आपसूक असत की ठरवून असत..?निर्हेतुक असत की सशर्त असत..!
आपण मोहमाये सकट रामाकडे येतो..!
बर इथं येतो आणि नमस्काराचा उपचार करून परत ही घेऊन जातो..!मग या मंदिरात येऊन आपण मिळवतो काय..?अनुताप हा कधीच असत नाही यामुळे..!
आजपासून अस करूया..रिक्त मनाने येऊ या मंदिरात..आणि जाताना राममय होऊन जाऊया..!मागायचं ही नाही आणि प्रदर्शन ही करायचं नाही..!

आणि मग आपल्या न कळत आपल्या भोवतीच्या मोहमाया असतील तर त्या नष्ट करायची बुद्धी आणि कृती राम च देईल...!

त्या जाळून टाकणारा राम नवमीला येतोय.!रामाला पुर्ण पुरुष म्हणतात..प्रत्येक नात्याला न्याय देणारा ..प्रत्येक नात जिवंत ठेवणारा राम..!

अवघड असत मोहमाया टाळून नात जगवण..खर तर अपेक्षा असते म्हणून नात जन्म घेत !या जन्माभोवती,नात्याभोवती,कर्तव्याभोवती घिरट्या घालणार आपल मन कधीतरी थकतच..!
तो रामराय येणारे ना..त्याच्या मांडीवर आपण हे मन,बुद्धी शरणगतेची उशी ठेवायची..!

आपल्याला माहीत आहे का राम हा एकमेव देव असा आहे ज्याला मनुष्यपणाची सगळी दुःख भोगायला लागली..!
आपण रामाला देवस्वरूप नको ठरवायला..आपण रामरायाला मैत्र करूया..आयावबहिणीनी माहेर ही करावं..तरुणी नी या रघुपतीला सखी करावं ना..तरुणांनी एक बलशाली आदर्श करावं..
वृद्धांनी आयुष्याचा घालवलेला काळ राम करावा...
असा जर राम करता आला ना..आपल्यात समावता आला न..तर राममय वृत्ती आणि त्याप्रमाणे त्या रघुराजाला आवडणार राममय आयुष्य आपल्याला ही जगता येईल..!

येता जाता राम नाम जपणाऱ्या आपल्यासारख्या जेष्ठ माणसांना हे सांगणे कदाचित अनुचित असेल पण भजनरहीत जन्म गेला अस म्हणताना आपण विचार करूया की मुखाने रामनाम घेत असताना किती काळ आपण तो राम आपल्या चपळ मनात   जागत ठेवला..!
मी आठवणीत नाही जागत ठेवला अस म्हणतोय..!
कारण अस आहे की या चपळ,सदा धावपळीच्या आयुष्यात जर आठवणी पेक्षाही राम मनात जागता असेल तर मन,शरीर कधीच दमू शकत नाही.आणि हे आपल्याला पटत जेंव्हा मन अनुतापी होते..आणि दुर्दैव अस की बहुतांशी तो आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध,वृद्धापकाळ असतो..!सर्व जन्म निघून गेलेला असतो..!
गात्र तशीही थकलेली असतात..अशावेळी हा अनुताप नाईलाजाने येतो..!
अस नको ना व्हायला..!
नाईलाजाचा अनुताप नाही तर श्रद्धेतून जन्माला येणारा अनुताप समर्थ रामासाठी तुमच्याकडे असावा असं सुचवतायत..!

तो रघुराज आपल्याला दिसण्यासाठी आपली पहिली पायरी आजच्या दिवशी ..अनुदिन अनुताप..!!🙏

©प्रवीण कुलकर्णी

*नाथषष्ठी*

*नाथषष्ठी*

कैवल्य आणि संसार या दोन्ही विषम अवस्थावर दृढ ठरलेलं व्यक्तिमत्त्व हे नाथमहाराज..!

भक्तक्षेत्रात त्यांना आनंदसगर म्हणतात..!

संत ही सामाजिक प्रवृत्तीच अशी आहे की जे विचार करतात,शब्दात बोलतात आणि तेच आचरणात आणतात..!

केवळ भक्तिमार्ग आणि त्यानुरूप मानसिक शक्ती याचे पुरेपूर उदाहरण असणारे नाथ पैठण क्षेत्रात होते पण सर्व चराचरात उदाहरण म्हणून राहिले.

आपण ना त्यांना फक्त एक कथेतून च ओळखतो..!थुंकणारा यवणाची कथा..!या पलीकडचे नाथ आपल्याला माहीतच नाहीत.

प्रचंड सामाजिक भान,परात्पर भूतदया याचा संयोग म्हणजे नाथमहाराज..!

आणि हे सगळं करताना त्यांची ईश्वरभक्ती तेवढीच प्रबळ आणि एकनिष्ठ..!

नाथवाड्यातल्या मूर्त देव्हारा आणि घरातला *श्रीखंडया* त्यांनी एक मानला..!

नाथमहाराज उत्तम साहित्यिक आहेत.सहित्यातला प्रत्येक प्रकार त्यांनी सामाजिक सुधारणा आणि ईश्वरभक्ती साठी वापरला आणि तो सर्वव्याप्त केला.

समाजसुधारक असून सुद्धा ईश्वराधीन असणं ही सत्शील आदर्श पुरोगामी वृत्ती बाळगलेले नाथमहाराज आजच्या दिवशी कैवल्याधीन झाले..!

कैवल्यउपनिषद प्रत्यक्ष जगणारे असे हे  नाथमहाराज ..!!


©प्रवीण कुलकर्णी🙏